‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका सतत चर्चेत असते. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भावा-बहिणीच्या नात्यावर नुकतेच एक गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सूर्याच्या बहिणी रक्षाबंधनाचा सण विसरल्या आहेत, असे सूर्यासमोर वागताना दिसत आहेत.

बहिणी देणार सूर्याला आश्चर्याचा धक्का!

प्रोमोच्या सुरुवातीला सूर्या त्याच्या दुकानात असून आपल्या मित्रांना सांगतो, “माझ्या बहिणींना रक्षाबंधन आज आहे तेदेखील माहीत नाही. चारही बहिणी कामानिमित्त बाहेर गेल्या आहेत”, असे तो सांगतो. त्यावर त्याचा मित्र म्हणतो की, “सगळ्या बहिणी एकदमच गजनी कशा काय झाल्या?” तेवढ्यात त्याला फोन येतो, शंकरमामांना कसंतरी होतंय. तो घरी जातो तर त्याच्या बहिणींनी त्याच्यासाठी रक्षाबंधनाची तयारी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. “हॅपी रक्षाबंधन दादा”, म्हणून त्या सूर्याचं स्वागत करतात आणि त्याला ओवाळण्यासाठी घेऊन जातात. त्यांच्याबरोबरच सूर्याच्या आत्यादेखील त्याच्या वडिलांना राखी बांधत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीला ‘भावा-बहिणीचं नातं स्वर्गाहूनी सुंदर, नात्यांना जोडणारा सण रक्षाबंधन’ हे गाणं ऐकायला मिळत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘बहिणी देणार दादाला रक्षाबंधन स्पेशल सरप्राईज!’ असे म्हटले आहे.

हेही वाचा: वडिलांची ‘ती’ अट आणि अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी केलं लग्न, बिग बींनी स्वतःच केला खुलासा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमध्ये सतत ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत तुळजाचे लग्न करण्याची तयारी चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, डॉक्टर असलेल्या तुळजाला अशिक्षित सत्यजीतबरोबर लग्न करायचे नाही. तिला तिच्या कॉलेजमधील मित्राबरोबर लग्न करायचे आहे. सूर्याचे तुळजावर प्रेम आहे, मात्र तुळजाला दुसरा मुलगा आवडतो, हे त्याला माहीत होते. मात्र, तरीही जेव्हा जेव्हा तुळजा संकटात असते, त्यावेळी तो प्रत्येकवेळी तिला मदत करतो. आता सूर्या आणि तुळजा तिचं लग्न मोडण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आता मालिकेत पुढे कोणते नवे वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.