‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची लाडकी झाली. वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बहिणींवर भावाचे असलेले प्रेम, बहिणींची सूर्यादादावरील माया आणि त्याच्याप्रतिचा आदर, सूर्याने मित्र म्हणून तुळजाला प्रत्येक वेळी दिलेली साथ, तुळजाचा स्वत:चा सुरू असणारा संघर्ष यांमुळे अशा सगळ्या गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांचीच्या आवडत्या मालिकांपैकी एक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता झी मराठी वाहिनीने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केला आहे.

तुळजाची ‘ती’ मागणी तात्यांच्या जीवावर बेतणार

प्रोमोच्या सुरुवातीला तुळजा सूर्याच्या वडिलांना म्हणते की, आधी ही दारू सोडा, मी पहिल्यांदाच तुमच्याकडे काहीतरी मागतेय. कराल ना एवढं? त्यावर सूर्याचे वडील म्हणतात की, नक्की सोडेन. त्यानंतरच्या दृश्यात पाहायला मिळते की, घराच्या अंगणात सूर्याचे वडील बेशुद्ध पडल्याचे दिसतात. ते पाहताच सूर्याच्या बहिणी तात्या म्हणून मोठ्याने ओरडतात. सगळे जण गोळा होतात. काय होतंय त्यांना? असं का वागताहेत ते? त्यावर तुळजा म्हणते की, त्यांना दारूचा ओव्हरडोस झाला आहे. तोपर्यंत सूर्या घरी येतो. “तात्या डोळे उघडा ना, उठा तुम्ही,” असे तो म्हणताना दिसतो. त्यानंतर तो तुळजाला ओरडून म्हणतो की, तुला म्हटलं होतं ना मी, त्यांची दारू सुटणार नाही. सूर्याच्या डोळ्यांत अश्रू आणि तुळजाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत आहे.

या मालिकेचा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, ‘तुळजाच्या मागणीने काही विपरीत तर घडणार नाही ना?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तुळजाला तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थशी लग्न करायचे असते. त्यासाठी तिच्या घरच्यांनी ठरविलेल्या मुलाबरोबर लग्न करण्याच्या वेळी ती लग्नघरातून सूर्याच्या मदतीने बाहेर पळून जाते. मात्र, ठरलेल्या ठिकाणी सत्यजित नसतो. सूर्या आणि तुळजा परत येतात तोपर्यंत तुळजा सूर्याबरोबर पळून गेली आहे, अशी माहिती सगळीकडे पसरलेली असते. तुळजाच्या वडिलांना म्हणजेच डॅडींना सर्वांत जास्त प्रतिष्ठा प्रिय असते. डॅडी जबरदस्तीने सूर्या व तुळजाचे लग्न लावतात आणि त्यांच्यासाठी ती जिवंत नाही, असे जाहीर करतात. त्यानंतर तुळजा सूर्याच्या घरी जाते. त्याच्या बहिणींची लग्ने होईपर्यंत ती त्या घरात राहण्याचे कबूल करते. सूर्याची आई त्याच्या वडिलांना सोडून गेल्याने त्याचे वडील कायम दारूच्या नशेत असतात. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्याच्यावर येते. आता तुळजाच्या प्रयत्नाने त्यांची दारू सुटणार की त्याचे वेगळे परिणाम होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: “मला कुठलाही भयंकर आजार झालेला नाही”, सुशांत शेलारने वजन घटण्यामागचं सांगितलं नेमकं कारण, म्हणाला…

दरम्यान, आता तात्या बरे होणार का? त्यावरून सूर्या आणि तुळजामध्ये वाद होणार का? तात्या बरे झाल्यानंतर त्यांची दारू सुटणार का? त्यासाठी तुळजा काय प्रयत्न करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.