Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या जान्हवी घरातून पळून गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवी पळून जाण्याचा निर्णय घेते. नवरा ऑफिसला गेल्यावर जानू गच्चीचं टाळं फोडते आणि तिथून पळ काढण्यात यशस्वी होते.

जयंतच्या घराला खिडक्या नसतात, दिवसभर जान्हवीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने संपूर्ण घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून ठेवलेले असतात. याशिवाय घरात जान्हवीच्या मोबाईलला नेटवर्क येऊ नये याचीही तरतूद केलेली असते. यामुळे दिवसभर एवढ्या मोठ्या दारं-खिडक्या नसणाऱ्या घरात जान्हवी एकटी कंटाळून जाते. तिला काय करावं हे सुद्धा सुचत नसतं. यानंतर लेकीला भेटण्यासाठी अचानक जानूचे आई-बाबा म्हणजेच लक्ष्मी-निवास येतात.

बायकोच्या माहेरच्या लोकांनी असं अचानक घरी आलेलं सुद्धा जयंतला आवडत नाही. परिणामी, तो जानूला शिक्षा देण्याचं ठरवतो. तो शिक्षा म्हणून जानूचा हात स्वत:च्या हाताला बांधून ठेवतो. या सगळ्या त्रासाला कंटाळून जान्हवी घरातून पळून जाते. पण, घराबाहेर गेल्यावर रस्त्यावर फिरणारं जोडपं पाहून तिला जयंतची आठवण येते आणि ती घरी परतण्याचा निर्णय घेते.

दुसरीकडे, जयंत ऑफिसवरून आधी घरी पोहोचतो आणि बायको घरी नाहीये हे पाहून तो प्रचंड अस्वस्थ होतो. यानंतर जान्हवी घरी येते. ती नवऱ्याला आवाज देते. दोघंही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. पण, काही क्षणांतच जयंत स्वत:चं खरं रुप दाखवतो. आता शिक्षा होणार…असं तो जान्हवीला सांगतो.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. जान्हवीला अनेकांनी कमेंट्समध्ये “बावळट, मूर्ख” असं म्हटलं आहे. तर, काही युजर्सनी, “लेखकांचा पर-डे वाढवा म्हणजे त्यांना चांगल्या कथा सुचतील”, “आताच्या मुली हे सगळं सहन करणार नाहीत काहीही दाखवताय”, “आता भोग त्याच्या विकृत स्वभावाला”, “आता परत नवीन शिक्षा दाखवतील”, “तुमच्याकडे दुसऱ्या कथा नाहीयेत का?”, “विचार न करता मालिका बनवता” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

lakshmi niwas
लक्ष्मी निवास मालिका – नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ८-९ या वेळेत प्रसारित केली जाते. या कौटुंबिक मालिकेत प्रेक्षकांना दळवी कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळत आहे.