मुंबईतील जोगेश्वरी येथील १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. काका आणि त्यांच्या कुटुंबासह राहत असलेली ही शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या काकांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर पीडित मुलगी दादर स्टेशनजवळ आढळली. पोलिसांनी चौकशी केली असताना मुलीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. याच प्रकरणावरून मराठी अभिनेता अक्षय केळकरने ( Akshay Kelkar ) सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
२४ फेब्रुवारीला शाळा सुटल्यापासून पीडित मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी एकटी असल्याचं बघताच पाच नराधमांनी वेळ साधली. तिला संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मुलीच्या काकांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मग २७ फेब्रुवारीला पीडित मुलगी सैरभैर अवस्थेत दादर स्टेशनला रेल्वे पोलिसांना सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि तिच्या चौकशीत लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. पीडितेच्या चौकशीनंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो ) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाच नराधमांना अटक केली.
अभिनेता अक्षय केळकर ( Akshay Kelkar ) हीच बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हणाला, “आता हे अती झालं. कायद्याचा धाक राहिला नाही कोणालाच…मेट्रो सिटीमध्ये ही परिस्थिती तर बाहेर अशा बऱ्याच गोष्टी असतील…#भीषण…”

दरम्यान, अक्षय केळकर ( Akshay Kelkar ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना माहिती देत असतो. तसंच आजूबाजूच्या घडामोडींवर परखड भाष्य करत असतो. कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी अक्षय ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने अगत्यची भूमिका साकारली होती. पण, त्याच्या या मालिकेने अवघ्या काही महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. टीआरपीच्या कारणास्तव ‘अबीर गुलाल’ मालिका बंद करण्यात आली. सध्या अक्षय वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे. मे महिन्यात अभिनेता बोहल्यावर चढणार आहे.