झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे कश्यप परुळेकर. नुकतंच त्याने पुन्हा एकदा मालिका करण्यामागील खरं कारण सांगितले.
कश्यप परुळेकरला ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेमुळे पुन्हा एका प्रेक्षकांची पसंती मिळाली. कश्यपने २००९ मध्ये ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेमुळे तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. पण त्यानतंर तो चित्रपटसृष्टीकडे वळला. त्याबद्दल नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने भाष्य केले.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
“मन उधाण वाऱ्याचे ही मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली. त्यानंतर मी चित्रपटात काम करायचं, असं ठरवलं. मला त्या काळात अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण चुकीच्या लोकांच्या सानिध्यात गेल्याने मला खूप मोठे नुकसान झाले. त्याबरोबरच जे काही चित्रपट मिळाले, त्यातले काही अर्धवट झाले. तर काही चित्रपट हे पूर्ण होऊनही प्रदर्शित झाले नाही. त्यामुळे मग माझी प्रसिद्धी कमी झाली. यावेळी मला अनेकांनी हे करु नकोस असा सल्लाही दिला होता. पण मी ते ऐकलं नाही.
या दरम्यानच्या चार ते पाच वर्षांच्या काळात मी जवळपास २२ मालिका नाकारल्या. माझे काही चित्रपट लोकप्रिय झाले. पण आता आपण मालिकेकडे वळलं पाहिजे. कारण मालिका या तुम्हाला लगेचच प्रसिद्धी मिळवून देतात. तुमच्या अभिनयाची कला घराघरात पोहोचवण्याचे काम या मालिका करत असतात. विशेष म्हणजे मालिकेत काम करत असताना तुम्हाला तुमच्या कामाची पावतीही लगेचच मिळते. त्यामुळेच मी पुन्हा एकदा मालिकेत वळलो”, असे कश्यप परुळेकर म्हणाला.
दरम्यान कश्यप परुळेकरने ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तो ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘तप्तपदी’, ‘वास्तुरहस्य’, ‘पानिपत’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा चित्रपटात झळकला. पण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. त्यानंतर अभिनेत्री श्रुती मराठेने त्याला ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी विचारले. त्याने कोणताही विचार न करता लगेचच होकार कळवला. या मालिकेमुळे पुन्हा एकदा तो प्रसिद्धीच्या झोतात आला.