अलीकडच्या काळात सगळे कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात येणारे चांगले-वाईट अनुभव हे कलाकार आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करतात. मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने नुकताच शिवशाही बसने प्रवास केला. या प्रवासादरम्यान आलेला अनुभव अभिनेत्याने फेसबुक पोस्ट लिहित शेअर केला आहे.

‘मुरांबा’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता ऋतुराज फडकेने नुकताच शिवाशाही बसमधून प्रवास करताना आलेला अनुभव त्याच्या चाहत्यांना सांगितला आहे. बसमधला एसी बंद पडल्याने प्रवाशांना कशाप्रकारे त्रास झाला, यानंतर पनवेल येथे पोहोचून बस बंद झाल्यावर सगळ्यांची कशी गैरसोय झाली याची सविस्तर माहिती देत अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

ऋतुराज फडकेची पोस्ट

आजचा दापोली – ठाणे, शिवशाही बस मधला अनुभव…
बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं. एक ७० km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता… एसीमुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या. ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली. ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बसस्टॉपवर होती. तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता, परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली. त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या, बसमध्ये म्हातारी माणसं होती, जीव गुदमरत होता, शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली. पनवेलला स्टॅन्डच्या बाहेरच ती बंद पडली. कशी बशी ती स्टँडमध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं. मी पनवेलमध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो आणि आलो सुद्धा… बस अंदाजे दुपारी अडीच पावणेतीन वाजता ठाणे डेपोत पोहोचते, आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला, तुम्ही विसापूर स्टॉपवर चढलात ना? दापोली-ठाणे बस मध्ये होतात ना?? मी म्हटलं हो… डेपोतून समोरचा व्यक्ती म्हणाला, मग बस कुठे आहे बस अजूनपर्यंत ठाणे डेपोत आलेली नाहीये…
ही दुरवस्था शिवशाही बसची…

दरम्यान, अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स आलेल्या आहेत. “जीएसटी हवा असतो पण तशा सुविधा नाही! भीषण वास्तव”, “आम्हालाही असाच अनुभव आलाय”, “पावसाळ्यात छत्री उघडून बसावं लागतं”, “हा असाच कारभार आहे…” अशा प्रतिक्रिया युजर्सनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

Story img Loader