Marathi Actor Sagar Karande : जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत डॉ. निलेश साबळेंबरोबर कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट होती. या विनोदवीरांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. सागर कारंडे मध्यंतरी आजारपणामुळे मनोरंजन विश्वापासून दूर होता. यानंतर त्याने ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमातून पोस्टमनच्या रुपात पुन्हा एकदा एन्ट्री छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. आता अभिनेता नुकताच स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाई गं’ चित्रपटात झळकला होता.

सागर कारंडेने ( Sagar Karande ) मांडलं मत

सागर कारंडेने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ‘चला हवा येऊ द्या’ व ‘बाई गं’ चित्रपटातील भूमिकांबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेता म्हणाला, “मी स्वत:ला खूप वर्षांनी पडद्यावर ( चित्रपटात ) सागर म्हणून बघणार आहे. छोट्या पडद्यावर मी वेगळ्याच भूमिकेत होतो…त्यावेळी स्वत:ला पाहताना असं वाटायचं अरे मी यातून कधी बाहेर पडेन. साडीत नसलेला, मेकअप नसणारा सागर मी केव्हा बघणार? साधा सागर मला कधी पाहता येईल असं मला नेहमी वाटायचं आणि या चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली.”

हेही वाचा : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक, अडीच किलो कोकेन जप्त, अधिकारी माहिती देत म्हणाले…

सागर कारंडे पुढे म्हणाला, “मी गेली १५ ते १६ वर्षे स्वप्नील दादाबरोबर काम करतोय. त्याची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. त्याच्याबरोबरची केमिस्ट्री माझी आधीपासूनच खूप चांगली होती. त्याचं नेहमी असं होतं की हा सिनेमा खूप चांगला झाला पाहिजे आणि प्रत्येक फ्रेम उठून दिसली पाहिजे. यासाठी स्वप्नील दादा व दिग्दर्शन यांनी खूप मेहनत घेतली.”

हेही वाचा : Video : मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा ‘शुभ आशीर्वाद’ समारंभ! व्हिडीओमध्ये दिसली झलक

मराठी अभिनेता सागर कारंडे

“सुरुवातीला साडी नेसताना माझी खूप चिडचिड होती. त्यानंतर मला एवढी सवय झाली की, सहज सगळं जमायचं. जेव्हा मी स्वत: या भूमिका करायला लागलो तेव्हा बायकोचं मन देखील मला समजलं. आता तिला बाहेर जाताना तयारी करायला उशीर होतो तेव्हा मला आधीच माहिती असतं की, होणार उशीर समजून घ्यायला पाहिजे…मी या भूमिका केल्यामुळे आता मला तिला अगदी सहज समजून घेता येतं. त्यामुळे हा माझ्यात झालेला सकारात्मक बदल देखील आहे” असं सागर कारंडेने सांगितलं.