मराठी मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता शशांक केतकर नेहमी सामाजिक समस्यांविषयी भाष्य करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने फिल्मीसिटी बाहेरील अस्वच्छतेबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर तात्काळ महापालिकेने कारवाई करत फिल्मीसिटी बाहेरील कचरा उचलला. आता शशांकने मालाड येथील मालवणीमधील अस्वच्छतेबाबत आवाज उठवला आहे. शशांक नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

अभिनेता शशांक केतकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता म्हणतोय, “काय करायचं? मी रोज सकाळी घोडबंदर रोडवरून मढ आयलँडला शूटिंगला येतो. किमान दीड ते पावणे दोन तास गाडी चालवत रोज येतो, रोज जातो. त्या घोडबंदर रोडची अवस्था, त्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले आहेत. तिकडे इतकी घाण अवस्था आहे की विचारुच नका. तो रस्ता बरा की काय इतकी वाईट अवस्था आहे मढ आयलँडच्या रस्त्यांची. ज्या मढ आयलँडवरती काही नाही म्हटलं तरी वेगवेगळ्या भाषेची मिळून ५० वगैरे शूट चालू असतात. इतका महसूल गोळा करणारा मुंबईतला हा एक भाग आहे. पण, त्या भागातल्या रहिवाश्यांची जी काही गैरसोय होतेय ती बघण्यासारखी आहे. सगळ्या पर्यटकांना मुंबई दर्शनाला येताना फिल्मीसिटी व्यतिरिक्त मढ आयलँडला सुद्धा घेऊन या. पण ठाणा, फिल्मीसिटी, मढ आयलँड या सगळ्या त्रिकोणामध्ये आणखी एक भाग आहे, ज्याचा मी एक इथे फोटो टाकतो तो आधी बघा.”

हेही वाचा – कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या आईचं निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढे शशांक केतकर म्हणाला, “बघितलंत? हा भाग आहे मालाड पश्चिमेला एक बाजूला मालवणी पोलीस स्टेशन आहे आणि दुसऱ्या बाजूला मालवणी चर्च आहे. या दोन्ही ठिकाणांमध्ये साधारण १०० ते १५० मीटर अंतर आहे. याच १०० ते १५० मीटरच्या मधेच ही कचरा पेटी आहे. तुम्ही म्हणाल, आता तर ही स्वच्छ दिसतेय. पण ही सकाळची अवस्था असते. बिचारे आपले सफाई करणारे कामगार, आपले भाऊ रोज सकाळी येतात आणि हे स्वच्छ करतात, झाडतात. पण, तो परिसर इतका मोठा आहे. इतकी वस्ती त्याच्या आजूबाजूला आहे. ते जे तीन कचऱ्याचे डब्बे ठेवले आहेत, स्वच्छ केल्यानंतर एक-दीड तासांत भरून जात असतील आणि त्यानंतर जो कचरा ओव्हरफ्लो होतो दररोज, गेली अनेक वर्ष तो कसा असतो तेही बघा.”

“तुम्ही आता ही अवस्था सुद्धा पाहिली. तर मला गंमत याचीच वाटते. आता नेमकी आचारसंहिता आहे. त्यामुळे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल काही सांगायचं नाही. पण मी मुद्दाम आताच हा व्हिडीओ टाकतो आहे. कारण काय आहेना एखादी गोष्ट जेव्हा अधिकृतपणे होते तेव्हा त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. मी बोलतोय ते म्हणजे राजमाता. जी आपली गोमाता असते तिला आपण राजमातेचा दर्जा दिला आहे. ती गोमाता रोज त्या कचऱ्याच्या आवतीभोवती बसून तिचं पोट कसं भरतेय बघा. ही आताची अवस्था नाही. मी या भागात राहत नाही. तिथलं एकंदर अत्यंत गलिच्छ, गलथान वातावरण, तिथली हवा, तिथला तो वास या सगळ्याचा खरंतर मला त्रास होतं नाही. मी त्या भागात राहत नाही. मी दीड-दोन तास लांब ठाण्याला राहतो,” असं अभिनेता म्हणाला.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आनंद शिंदेंबरोबर झाली अचानक भेट, फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण…”

“पण, जरीही मी इथे राहत नसलो तरी मी या देशात राहतो. त्यामुळे या परिसराची मला एकंदरीत काळजी वाटते. मला तिथल्या लोकांची काळजी वाटते. गंमतीचा भाग काय आहे बघा, त्याच कचऱ्याला लागून एक बदाम शेकची गाडी सुद्धा दिसते. तो जो व्यावसायिक आहे, त्याच्याबद्दलही इतकं वाईट वाटतंय. त्या गाडीवर खाणाऱ्यांचं मला इतकं वाईट वाटतंय. त्या बाजूला असणाऱ्या पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांचं वाईट वाटतंय. त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या चर्चमध्ये जाणाऱ्या भक्तांचही मला वाईट वाटतंय. इतक्या अस्वच्छ घाणेरड्या वातावरणात ही सगळी मंडळी दुर्देवाने राहत आहेत. कारण ज्या राजमातेला नमस्कार करून हे सगळे राजकर्ते मत मागणार आहेत आणि ज्यांच्याकडून मत मागणार आहेत, ते सगळे कुठल्या अवस्थेत राहतायत ते बघा. पण अजूनही माझ्या मनातली आशा जिवंत आहे,” असं शशांक केतकर म्हणाला.

पुढे शशांक म्हणाला की, फिल्मीसिटी बाहेरच्या कचऱ्याचा मी व्हिडीओ टाकला आणि काही जणांनी मला सांगितलं, दादा आमच्या भागात ये. आमच्या भागातले व्हिडीओ टाक, फोटो टाक. तुझ्यामुळे स्वच्छ होईल. या सगळ्यांनंतर मला असं वाटलं, मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. मला जिथे जिथे असं दिसेल तिथे मी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. तर माझ्या मनातील आशा अजूनही जिवंत असल्यामुळे मी हे महानगरपालिकेच्या नजरेस आणून देतो. मी प्रयत्न करेन, जोवर हा कचरा रोज सकाळ, संध्याकाळ आवरला जात नाही. तोवर रोज मी निदान इन्स्टाग्रामवर फोटो टाकत जाईन. बघू ते जास्त निर्लज्ज आहेत की मी जास्त निर्लज्ज आहे. आता या सगळ्यानंतर माझ्या इंडस्ट्रीत काही जण किंवा प्रेक्षकही मला टोमणे मारतील. तुला काय करायचं आहे, कचरा असू दे किंवा अस्वच्छ असू दे, खड्डे असू दे, माणसं मरू दे तुला काय करायचं आहे? काम कर पैसे कमव आणि घरी जा. कारण काय आहे, आपल्याकडे काय आहे राज्यकर्ते, देव, पोलीस यांची भीती घातलेली आहे. हे आपले मित्र नाहीयेत. ते येऊन मारतील, हीच भीती घालून घालून आपल्याला कोडगं, निगरगड यामध्ये राहण्याची सवय लावली आहे. यातून आपण नवी पिढी बाहेर पडू या.

“अनेक कलाकार आहेत हे माझ्या मताला समर्थन देतील. पण, ‘त्या’ भीती पोटी खुलेआम समर्थन नाही करतील, सगळ्यांसाठी असंच होईल, मरू दे ना आमचं आजूबाजूला शूटिंग असतं. मरू दे घाण तर घाण. आपल्याला काय करायचं. पण मला करायचं आहे. ही माझी जबाबदारी आहे, समजतो. महानगरपालिकेच्या निर्दशनास आणून दिलं आहे. इतक्या मोठ्या परिसराला त्या तीन कचऱ्यांच्या कुंड्या पुरणार नाहीत किमान १५ कुंड्या हव्यात. खरंतर असं प्रत्येक चौकामध्ये हवं. कारण तुम्ही शहरात इतका मोठा विकास केला आहे. मग, त्या शहरात कचरा होणारच आहे. ही जबाबदारी नेमकी कोणाची? महानगरपालिकेने तिथे पेट्या वाढवायच्या असतील तर म्हणून बजेट नाहीये असं सांगणं, त्या लोकांना घरात कचरा निचरा करणं किंवा याकडे सगळ्यांनीच बघून दुर्लक्ष करणं पर्याय काय आहे तुम्हीच सुचवा,” असं शशांक केतकर म्हणाला.

हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

हा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “सरकार कोणतेही असो…आपली आणि आपल्या देशाची अवस्था कधी सुधारणार? ही जबाबदारी नेमकी कोणाची? इतका निर्लज्ज पणा येतो कुठून? सरकार बदललं की सगळं बदलेल वगैरे फालतू पर्याय सुचवू नका. गेली अनेक वर्ष आपला देश अस्वच्छ देशांच्या यादीत अग्रेसरच आहे. त्यामुळे या आधीच्या अनेक सरकारने सुद्धा काही आपल्याकडे, या समस्येकडे, सपशेल दुर्लक्षच केलं आहे. काहीतरी कायमस्वरूपी उपाय हवा आहे देशाला…माझा हा राग, संताप ….हा या अवस्थेबद्दल आहे… कोणा एका व्यक्ती किंवा पक्षाबद्दल नाही.” शशांक या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.