नालासोपारा येथे राहणाऱ्या रोहित यादव नावाच्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची अमानुषपणे हत्या केल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी वसईतील गावराई पाडा येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली. भररस्त्यात २२ वर्षांच्या आरती यादववर नराधम रोहितने लोखंडी पान्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. सध्या या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेता अंशुमन विचारेने संतप्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेता अंशुमन विचारे वसई हत्या प्रकरणी फेसबुकवर व्यक्त झाला आहे. त्याने लिहिलं आहे, “काल भररस्त्यात वसई चिंचपाडा भागात एका तरुणीची आरोपीने निर्घृण हत्या केली. सगळ्यात चीड येणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांसमोर त्या नराधमाने तिला मारलं. पण एकानेही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आपण खरंच इतके दगडाच्या काळजाचे झालोत का? खूप त्रास झाला तो व्हिडिओ बघून. कृपा करून बघ्याची भूमिका घेऊ नका. ही वेळ कोणाच्याही आया बहिणींवर येऊ शकते आणि पोलिसांना विनंती की कायद्याची भीती प्रत्येकाला बसेल असं करा कृपा करून हे सगळं चित्र विदारक आहे.”

हेही वाचा – Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन

अंशुमन विचारेच्या या पोस्टवर त्याचे काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “साहेब याला कारणीभूत पोलीस आहे. जर कोणी मदत केले तर त्यांनाच दहा प्रश्न विचारतील.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “कायद्याचा धाक कोणाला राहिलेला नाही. कितीही मोठा कांड करा महिना, दीड महिन्यात परतत बाहेर येतो. लाईव्ह उदाहरण आमच्याकडे पण झालेले एक असच खूप मोठा कांड होता सव्वा दोन महिन्यात बाहेर.”

हेही वाचा – “पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?” प्रसिद्ध दिग्दर्शकाची वसई हत्या प्रकरणाबाबत संतापजनक पोस्ट, म्हणाले, “मुर्दाड बघ्यांचं…”

दरम्यान, रोहित यादव आणि आरती यादव या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवलं आणि दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितनं आपल्याबरोबर आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. याप्रकरणी रोहितला अटक करण्यात आलं आहे. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.