छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार नियोजितस्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी ट्रेनने प्रवास करतात. मुंबई लोकलने प्रवास करताना सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात अनेक अनुभव येतात. अनेकदा ट्रेन उशिराने धावत असतात, काही वेळेस प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढता येत नाही. तर, एसी ट्रेनमध्येही उभं राहायला देखील जागा नसते. एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकतीच आपल्या लोकल प्रवासाची व्यथा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मांडली आहे. एसी ट्रेन वेळेत येत नसल्याने या अभिनेत्रीला कशाप्रकारे मनस्ताप सहन करावा लागलाय हे तिने सविस्तरपणे या पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय याकडे प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांचा हिताचा निर्णय घ्यावा असंही अभिनेत्रीने या पोस्टद्वारे सूचित केलं आहे.

‘३६ गुणी जोडी’ ते नव्याने सुरु झालेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री अक्षता आपटेने तिचा रेल्वे प्रवासाचा अनुभव एक पोस्ट शेअर करत सांगितला आहे. एसी लोकल वेळेत येत नसल्याने तिकिटाचे पैसे कसे वाया जातात हा मुद्दा अभिनेत्रीने या पोस्टद्वारे अधोरेखित केला आहे.

हेही वाचा : ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, लंपास केल्या मौल्यवान वस्तू; म्हणाली, “माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका…”

अभिनेत्री अक्षता आपटेची पोस्ट

मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं.

AC train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class च तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार.

घाईघाईत तिकीट विंडोवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतं. अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त १५/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत.

असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झालाय. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरलाय आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला ८ नं. वरुन धावत वर जाऊन main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेलीए. या दोन्ही cases मध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती.

पैसे वायाच दोन्हीकडे.

यात चूक कोणाची ?

वाहतूक कोंडी कमी व्हावी, प्रवासाचा वेळ वाचावा आणि थोडा आरामदायी प्रवास व्हावा म्हणून चालू केल्या आहेत ना AC ट्रेन्स? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?? उलट त्या तर top priority असल्या पाहिजेत ना… काय वाटतं? आणि M-indicator सुद्धा अशावेळी नेमकं कसं माती खातं के कळत नाही!

हेही वाचा : अंबानींचा थाट! लग्नपत्रिकेसह भेट दिली काश्मीरची ‘दोरुखा पश्मिना शाल’; काय आहेत वैशिष्ट्ये, किंमत किती?

दरम्यान, अक्षताच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी एसी ट्रेन वेळेत न आल्याने आम्ही महिन्याचा पास काढतो ते पैसेही फुकट वाया जातात असं म्हटलं आहे. तसेच अन्य काही युजर्सनी सुद्धा अक्षताच्या मताशी सहमती दर्शवली आहे.