‘बिग बॉस १३’ फेम टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने मागच्या वर्षी मार्च महिन्यात केनियामधील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर ती पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली, पण काही महिन्यांनी ती मुलगा जेडनला घेऊन भारतात परत आली. कालांतराने तिने इन्स्टाग्रामवरून दुसऱ्या लग्नाचे फोटो हटवले. मागच्या काही दिवसांत तिने तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आणि काही स्क्रीनशॉट्स शेअर केले होते. तिच्या या कृतींचा मनस्ताप होत असल्याचं निखिलने म्हटलं आहे.
निखिलने दलजीतपासून विभक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्यादिवशी ती मुलाला घेऊन घराबाहेर पडली, त्यादिवशीच आपलं नातं संपलं असं त्याने म्हटलं होता. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. निखिलने दलजीतला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दलजीत कौर सोशल मीडियावर तिच्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत आहेत. त्यासंदर्भात सतत पोस्ट करत आहे. या पोस्ट चुकीच्या आहेत. यामुळे तिच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे, असं निखिलने स्पष्ट केलं आहे.
दलजीतने त्यांच्या लग्नातील निखिलच्या मुलीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. निखिल म्हणाला, “या जगातील एक सामान्य नागरिक म्हणून भारतातील आणि जागतिक स्तरावर ऑनलाइन संरक्षण कायद्यातील तफावत पाहून वाईट वाटतं. मुलांसाठी धोकादायक आहे हे माहित असूनही काही लोक फक्त माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी निष्काळजीपणे पोस्ट करतात. संबंधितांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. खासकरून लहान मुलांच्या बाबतीत, जे समाजात नेहमीच असुरक्षित असतात आणि ज्यांना नेहमी कायद्याचं संरक्षण आवश्यक असते. हे सगळं बेकायदेशीर आणि निष्काळजीपणाने केलं जात आहे.”
निखिलने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या टीमने दलजीतला जून महिन्यात तिचं केनियामध्ये राहिलेलं सामान घेऊन जाण्यास सांगितलं आहे. “जर तू तुझं सामान नेलं, नाहीस तर त्या सगळ्या वस्तू दान केल्या जातील, कारण मी तुझ्या वस्तू जपून ठेवणं बंधनकारक नाही,” असं निखिलने स्पष्ट केला. आतापर्यंत अनेकदा आपण तिला तिचं सामान घेऊन जाण्यास सांगितलं आहे, असंही त्याने नमूद केलं.
निखिलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कायदेशीर टीमने हे स्पष्ट केलं आहे की ते यापुढे कोणताही छळ सहन करणार नाहीत. दलजीतने असंच बेजबाबदारपणे वागत सोशल मीडियावर पोस्ट करणं सुरू ठेवल्यास तिच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही निखिलने स्पष्ट केलं आहे.