Bigg Boss Marathi 5 पाचच्या पर्वात सहभागी झालेली निक्की तांबोळी विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहिली. मात्र, सर्वात जास्त अरबाज पटेलबरोबर असलेल्या तिच्या मैत्रीची मोठी चर्चा झाली. याआधी ‘द खतरा-खतरा’ आणि बिग बॉस ओटीटीमध्ये निक्कीचे नाव प्रतीक सहजपालबरोबर जोडलं गेलं होतं. आता निक्कीने एका मुलाखतीत प्रतीकबरोबरची मैत्री आणि अरबाजबरोबरची मैत्री यामध्ये फरक असल्याचे तिने म्हटले आहे.

काय म्हणाली निक्की तांबोळी?

निक्की तांबोळीने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, तू बिग बॉसच्या घरात असताना आधीच्या शोमधील रील व्हायरल होत होते, त्यामध्ये प्रतीकबरोबर तुझं खास बॉन्डिंग दिसत होतं; तर त्याच्याबरोबरचं कनेक्शन कसं होतं आणि त्याची तुलना अरबाजबरोबर असलेल्या नात्याबरोबर होऊ शकते का? यावर बोलताना निक्की तांबोळीने म्हटले, “प्रतीकबरोबर मी एक चित्रपट केला आहे, अजून तो प्रदर्शित झाला नाही. बहुतेक त्याचं थोडं शूटिंग अजून राहिलं आहे. पण, प्रतीक आणि माझे नाते हे निर्मळ मैत्रीचे आहे. त्याच्याबरोबर बॉन्डिंग दिसली ती खरी आहे. जे एक्स्ट्रा दाखवलं गेलं आहे ते रिअ‍ॅलिटी शोसाठी कंटेन्ट असतो, त्यामुळे तुमची जितकी चांगली मैत्री असते, तितका तुम्ही कंटेन्ट तयार करू शकता. माझे आणि अरबाजचे नाते खूपच वेगळे आहे, प्रतीकबरोबर फक्त मैत्री आहे.”

मराठीमध्ये काम करण्याचा काही विचार आहे का? यावर बोलताना निक्कीने “मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल, पण आश्चर्याची बाब अशी आहे की, मला साऊथमधूनदेखील प्रोजेक्ट मिळत आहेत, त्यामुळे हे माझ्यासाठी चांगले आहे.”

हेही वाचा: Video : आज आई-बाबा असते तर…; पुरस्कार मिळताच पालकांच्या आठवणीत ‘शिवा’ला अश्रू अनावर; मुक्ता बर्वेने दिला धीर

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळीची पहिल्या दिवसापासून मोठी चर्चा झाली. तिने केलेल्या भांडणांमुळे, खेळात वापरलेल्या स्ट्रॅटजीमुळे, जान्हवी बरोबर सुरुवातीला असलेली मैत्री आणि नंतर झालेल्या वादामुळे ती सातत्याने चर्चेत राहिली. अरबाज पटेलबरोबर तिची फक्त शोपुरती मैत्री आहे, असेदेखील म्हटले जात होते. मात्र आता शोनंतर ते अनेक ठिकाणी एकत्र दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता बिग बॉस मराठी ५ नंतर निक्की कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.