Bigg Boss Marathi 5 च्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या मैत्रीची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. या शोमध्ये त्या दोघांमध्ये जवळीकता दिसून येत होती. आता शो संपल्यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. मात्र, ज्यावेळी अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यातील जवळीकता वाढत होती, त्यावेळी सोशल मीडियावर अरबाजवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्याच्याविषयी अनेकविध गोष्टी बोलल्या जात होत्या. त्याचा साखरपुडा झाला आहे, असेही म्हटले जात होते.

अरबाज पटेलबद्दल निक्कीच्या आईची प्रतिक्रिया काय होती?

बिग बॉसमध्ये ज्यावेळी फॅमिली वीक सुरू होता, त्यावेळी निक्की तांबोळीचे आई-वडील घरात आले होते. तिच्या आईने तिला बाहेर होणाऱ्या चर्चांविषयी तिला सांगितले होते. अरबाजचा साखरपुडा झाला आहे, असे बोलले जात आहे, असे निक्कीला तिच्या आईने सांगितले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्की तांबोळीने तिच्या आईने अरबाजबद्दल काय म्हटले ते सांगितले.

निक्की तांबोळीने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूडला’ मुलाखत दिली. यावेळी तिला, जेव्हा तू घराबाहेर आलीस तेव्हा तुझ्या आईचा अरबाजबद्दलचा दृष्टिकोन बदलला का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “माझ्या आईनं मला म्हटलं की, निक्की अरबाज तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या डोळ्यांत आम्ही बघितलं आहे की, तो तुझ्यावर किती प्रेम करतो. त्यानं स्टेजवर सगळ्यांसमोर म्हटलं होतं की, मला तिचं वेड लागलं आहे. जर अशा रीतीनं कोणता मुलगा कोणत्या मुलीसाठी तिच्या आई-वडिलांसमोर म्हणतो, त्याचा अर्थ असा आहे की, त्याच्या मनात माझ्याविषयी भावना आहेत. त्याचा मी आदर करते. कारण- माणूस चुकीचा नसतो; परिस्थिती चुकीची असते आणि त्यामुळे माणसाला वाईट वागावं लागतं. शेवटी बिग बॉसचं घर तुमच्या संयमाची परीक्षा घेतं. कधी ना कधी तुम्ही स्वत:वरील संयम घालवून काही शब्द बोललात, काही गोष्टी केल्यात; ज्यामुळे तुम्ही वाईट दिसलात. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही माणूस म्हणून वाईट आहात.”

हेही वाचा: भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीची संपत्ती आहे ४६०० कोटी

दरम्यान, निक्की तांबोळीने बिग बॉसच्या पाचव्या पर्वात टॉप ३ मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. मात्र, तिला तिसऱ्या स्थानावरून घराबाहेर पडावे लागले.