Paaru Fame Sharayu Sonawane : अलीकडच्या काळात फास्ट फूड, जंक फूड खाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. निरोगी आणि सकस आहाराचं सेवन करणं अनेकांना आव्हानात्मक वाटू शकतं. परंतु, नैसर्गिक घटकांनी शरीराचं पोषण करणं हे वाढत्या वयासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फास्ट फूडपेक्षाही, सकस आहार ही एक जीवनशैली आहे, जी काम करायला अधिक ऊर्जा देते.

कलाकार कसे आपल्या आहाराची काळजी घेतात याची उत्सुकता तुम्हालाही असेल. आज तुमची लाडकी ‘पारू’ म्हणजेच शरयू सोनावणे हिने तिच्या डाएट प्लॅनबद्दल प्रेक्षकांना सांगितलं आहे.

शरयू म्हणाली, “मी जास्त करून हलकं-फुलकं आणि सहजपणे पचेल असाच आहार घेते. मी सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाते. त्यानंतर जिरापाणी किंवा नारळपाणी पिते. मग सेटवर येऊन पोहे, उपीट, इडली किंवा ऑम्लेट ब्रेड असा काहीतरी ब्रेकफास्ट करते. त्यानंतर एखादं फळ जसं की संत्र, सफरचंद, मस्कमेलन, कलिंगड किंवा किवी खाते. सकाळचा नाष्टा झाल्यानंतर मधल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते १२:३० मध्ये मी सलाड खाते आणि त्यानंतर मी सरळ दुपारी जेवते. दुपारच्या जेवणात एक भाकरी आणि कुठलीही भाजी त्याच्या जोडीला दही असतं. कधी फारच मन झालं तर डाळ खिचडी किंवा इंद्रायणी भात आणि डाळ असं जेवण मी दुपारी जेवते.”

“लंचनंतर सूर्यास्त होईपर्यंत मखाना, चणे- शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खाते. आधी मी संध्याकाळी ७ वाजता लास्ट मिल करायचे आता दुपारी जेवण झाल्यावर त्यानंतर पौष्टिक आणि हलके स्नॅक्स खाते, रात्री जेवत नाही. कारण, सूर्यास्त झाला की आपली पचनशक्ती मंद होते. मी दिवसभरात २.५ ते ३ लिटर पाणी पिते आणि उन्हाळ्यात ताक किंवा सब्जाचे पाणी पिते. आपण सर्वांनी शक्यतो घरचंच खाल्लं पाहिजे… कधीतरी बाहेरचं खाऊ शकतो, जसं मी जेव्हा घरी सुट्टी घेऊन जाते तेव्हा माझ्या मनाला येईल ते मी खाते. पण, पुन्हा ‘पारू’च्या सेटवर आले की मी माझा नेहमीचा नित्यक्रम पाळते. जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही आपलं काम चांगल्याप्रकारे करू शकता.” असं शरयू सोनावणेने सांगितलं आहे.

sharayu
पारू फेम शरयू सोनावणे डाएट प्लॅन

दरम्यान, प्रेक्षकांनी सुद्धा पौष्टिक आहारावर भर द्यावा असं आवाहन अभिनेत्रीने केलं आहे. शरयू सोनावणेची ‘पारू’ मालिका रोज संध्याकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. यामध्ये तिच्यासह अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेला गेल्या वर्षभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.