Bigg Boss Marathi 5 च्या घरातून पंढरीनाथ कांबळे कमी मते मिळाल्यामुळे नुकतेच बाहेर पडले आहेत. बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मुलाखतींमधून केलेली वक्तव्ये चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पंढरीनाथ कांबळे यांनी नुकतीच ‘टोटल मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना एक टास्क देण्यात आला. तो असा होता की, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना फळ किंवा भाजीचे नाव देऊन, ते नाव का दिले याबद्दलचे कारण सांगायचे होते.

काय म्हणाले पंढरीनाथ कांबळे?

अंकिताला कोकणातील ‘हापूस आंबा’ म्हणत पंढरीनाथ कांबळे यांनी तिचे कौतुक केले. या फळाचे नाव देण्यामागचे कारण सांगताना त्यांनी म्हटले, “कोकणातील हापूस आंबा आपल्याकडे हवा, असे वाटत असते. संपूर्ण जगाला या हापूस आंब्याची आतुरता असते. गोड, रसाळ तेवढीच तिची गोड वाणी आहे. तिचे विचार खूप छान आहेत. आंबा कधी कधी खराब होतो; कारण तुम्ही त्याला नीट ठेवत नाही, त्याचे जतन व्यवस्थित करीत नाही. तुम्ही जसं त्याला ठेवाल, तसा तो आंबा राहतो.”

पंढरीनाथ कांबळेंनी सूरज चव्हाणला ‘अक्रोडा’ची उपमा देत म्हटले, “सूरज वरून दिसतो स्ट्राँग; पण आतून खूप हळवा आहे तो. कारण- मला आठवतंय घनश्याम जेव्हा आई-बाबांची गोष्ट सांगत होता, त्यावेळी सूरजच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. हुंदकापण नव्हता. म्हणजे त्याला कळतं, त्याला जाणीव आहे की, आई-बाबा म्हणजे काय आहेत; ज्यांना नसतात, त्यांना जास्त कळतं. तर तसा आहे तो. वरून दिसताना खूप कडक दिसतो; पण आतून मऊ आहे.”

धनंजय पोवारविषयी बोलताना त्यांनी त्याला ‘कारल्या’ची उपमा दिली. पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “रोज त्याच्याशी बोलू वाटत नाही किंवा त्याच्याशी गप्पा माराव्याशा वाटत नाही.”

निक्की तांबोळीला कडू लिंबू म्हटले; तर जान्हवी फणसासारखी आहे, असे म्हटले. जान्हवीने आधी काटेरी काटेरी दाखवले. नंतर आता ती गरा दाखवते आहे. गरा खाल्ल्यानंतर कधी कधी त्रासपण होतो पोटाला. तर, ताईंनी जरा जपून खावा तो गरा, असे पंढरीनाथ कांबळेने म्हटले.

अभिजीत हा सगळ्यांना आवडतो, असे म्हणत पंढरीनाथ कांबळेंनी त्याला केळ्याची उपमा दिली. पुढे म्हटले, तो केळ्यासारखा आहे. त्याच्यावरून कधी पाय घसरेल ते सांगता येत नाही. त्यामुळे माझ्या टीम मेंबरना जरा काळजीने राहा, असे सांगेन. कारण- तो कधीही त्याच्या सालीवरून घसरून पाडू शकतो.

हेही वाचा: तुषार कपूरची दोन फेसबुक अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाला, “माझी टीम…”

दरम्यान, बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार हे सदस्य आहेत. आता यापैकी कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.