‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याला आता काहीच दिवस उरले आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या नॉमिनेशनध्ये प्रसाद जवादे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. आता घरात केवळ राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर, अपूर्वा नेमळेकर हे सदस्य अखेरच्या आठवड्यात दिसणार आहेत. पण आता प्रसाद जवादेनं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शेअर केलेली पहिली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
प्रसादने पहिल्या दिवसापासूनच त्याच्या खेळाने आणि घरातील त्याच्या वागणुकीमुळे सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं. तो इलिमिनेट झाल्याने सर्वच स्पर्धकांना दुःख झालं. आपल्याला घराबाहेर पडावं लागतंय ते ऐकून प्रसादचेही डोळे पाणावले. सगळ्या स्पर्धकांनी भावूक होत प्रसादला निरोप दिला. तर घराबाहेर जाताना प्रसादने सर्व स्पर्धकांची माफी मागून “आपली जी भांडणं आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया,” असं म्हणाला. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.
प्रसादने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “अजूनही विश्वास बसत नाहीये की बिग बॉस मराठी सिझन ४ चा माझा प्रवास संपला. खेळाच्या अंतिम टप्प्यावर येऊन बाहेर पडलो ह्याच खूप दुःख आहे पण मला एक गोष्ट खात्रीपूर्वक माहीत आहे की सलग ८ आठवडे नॉमिनेटेड असताना सतत साथ आणि वोट्स देणाऱ्या माझ्या पलटणच्या प्रेमाची पॉवर इतकी आहे की वोट्स काय, सारं जग जिंकता येईल. घरातील प्रवासात खूप उतार चढाव होते पण तुमच्या प्रेमामुळे सतत एक उमेद आणि ऊर्जा मिळत होती. तुमच्या सर्वांचा कायम आभारी असेन.”
पुढील आठवड्यात या पार्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या आठवड्याच्या मध्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. तर नुकतंच अपूर्वाला तिकिट टू फिनाले मिळाल्यामुळे ‘बिग बॉस मराठी ४’ची फायनलिस्ट म्हणून तिचं नाव निश्चित झालं आहे. त्यामुळे आता फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर यांच्यात चुरस रंगलेली पाहायला मिळणार आहे.