‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे एकूण तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अण्णा नाईक, शेवंता, वच्छी ही पात्र सोशल मीडियावर सुद्धा हिट झाली होती. विशेषत: वच्छी या भूमिकेचा डान्स सर्वत्र व्हायरल झाला होता. मालिकेत वच्छी हे पात्र संजीवनी पाटीलने साकारलं होतं.
वच्छी या पात्राचा मृत्यू झाल्याचा सीक्वेन्स ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या भागात दाखवण्यात आला होता. पण, ही मूळ कथा नसून संजीवनीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याने हे पात्र मालिकेत मारलं गेलं असं स्पष्ट मत अभिनेत्रीने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे.
संजीवनी पाटील म्हणते, “झी मराठीचा सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार घरात धूळ खात पडलाय. मी तो पुरस्कार घेऊन ऑडिशनसाठी फिरू का सगळीकडे मला काम द्या…काम द्या…; मी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या भागात काम करण्यासाठी मी एक मालिका सोडली होती. पण, पैसे वाढवून मागितल्यावर सेटवर वेगळा अनुभव आला. माझं असं झालं की… तू जे काम करतेस ते अडीच-तीन हजारांचं आहे का? मला हळुहळू त्रास व्हायला सुरुवात झाली. माझी भूमिका यांनी मारली. मालिका सोडल्यावर तुला यापुढे कोण काम देतंय ते सुद्धा मी पाहतो असं मला सांगण्यात आलं.”
संजीवनीने काही दिवसांपूर्वी निलेश परब यांच्या एनपी क्रिएशनला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सविस्तर सांगितलं होतं. “आज मी नॅशनल टेलिव्हिजनवर सांगते, वच्छी ही भूमिका मरणारी कधीच नव्हती. पण, तो सीक्वेन्स आणला गेला. वच्छीच्या भूमिकेसाठी मला अवॉर्ड मिळाला होता. तिसऱ्या सीझनसाठी चॅनेलकडून बोलावलं जातं, त्या भूमिकेचं मार्केटिंग केलं जातं. पण, ती परत आल्यावर गोष्टी जुळत नाही मग, त्या भूमिकेला मारून टाकलं जातं. मोठ्या कलाकारांना तुम्ही पर-डे चांगला देता. मग, माझ्यासारख्या मातीतल्या कलाकारांना का डावललं जातं? पण, आता मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. विचार करून काम निवडते आणि येत्या काळात, २०२५ मध्ये मला भरपूर काम करायचं आहे.”
“मी आता माझे काही निकष ठरवले आहेत. मी अडीच-तीन हजारात काम करणार नाही. आज मी हे सर्वांसमोर सांगते आणि मी तेवढ्या पैशांत काम करत सुद्धा नाही… समोरच्याला मी नकार देते. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतली वच्छीची भूमिका ही मरणारी होती का? मरण खरंच होतं का त्या भूमिकेला? ती भूमिका खरंच खूप मोठी झाली असती. माझ्यासारखं मालवणी बोलून दाखवा तुम्ही मला, असं मी त्यांना ( सेटवर ) नेहमी बोलायचे. मग वच्छीच्या भूमिकाला मारायची काय गरज होती? कारण, वच्छीने पर-डे मानधन वाढवायला सांगितलं होतं.” असा अनुभव अभिनेत्रीने सांगितला होता.