कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. यंदा या शोच्या पहिल्याच भागात अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या कुटुंबीयांसह उपस्थिती लावली होती. यानंतर आता कपिलच्या शोमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू सहभागी झाले होते. शोमध्ये सहभागी झालेल्या रोहितने वर्ल्डकप दरम्यानच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवावर भाष्य केलं. कपिलच्या शोमध्ये भारताचा हिटमॅन नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

कपिल शर्माच्या शोचा दुसरा भाग शनिवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात आला. यावेळी रोहित शर्मा, श्रेयस अय्यर सहभागी झाले होते. यावेळी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याबद्दल रोहितने दु:ख व्यक्त केलं. यावेळी तो काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : अदिती राव हैदरीशी सिद्धार्थ कधी करणार लग्न? गुपचूप साखरपुडा उरकल्यावर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “याचा निर्णय…”

“वर्ल्डकप अंतिम सामन्याच्या बरोबर दोन दिवसआधी आम्ही अहमदाबादला गेलो. टीममधलं वातावरण अतिशय सुंदर होतं. आम्ही अंतिम फेरीत सुद्धा चांगली सुरुवात केली होती. शुभमन आधी बाद झाला. परंतु, जेव्हा तुम्ही अंतिम सामना खेळत असता, तेव्हा मोठी धावसंख्या उभारावी लागते. जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होईल. गिल बाद झाल्यावर मी आणि विराटने भागीदारी केली. पण, ऑस्ट्रेलिया या लढाईत आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. त्यांनी उत्तम खेळ केला. त्यांच्या खेळाडूंनी उत्तम पार्टनरशीप देखील केली. मला वाटलं वर्ल्डकप भारतात होऊनही आपण हरलो त्यामुळे आज संपूर्ण देशातील चाहते आमच्यावर रागावले असतील. पण, लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं. आमचं कौतुक केलं.” असं रोहितने सांगितलं.

हेही वाचा : “त्या दिवसापासून पुन्हा शिवी दिली नाही”, ‘लालबाग परळ’, ‘दुनियादारी’ चित्रपटांबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, “माझ्या आईने…”

रोहितने सांगितलेल्या वर्ल्डकपच्या आठवणी ऐकून अर्चना पुरण सिंगने त्याच्यासाठी उठून टाळ्या वाजल्या आणि आपल्या भारतीय कर्णधाराचं कौतुक केलं. ती म्हणाली, “तुम्ही वर्ल्डकप जिंकलात किंवा हरलात यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे सगळ्या खेळाडूंनी आमची मनं जिंकली आहेत.”

दरम्यान, रोहित शर्मा सध्या IPL मध्ये व्यग्र आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही आणि चाहत्यांना MI च्या विजयासह रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Story img Loader