Pahalgam Terror Attack Updates : जम्मू काश्मीरचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर बेछूटपणे गोळीबार केल्याची घटना २२ एप्रिलला घडली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हा हल्ला केला. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. सरकारने या दशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी पहलगाम हल्ल्याबाबत पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून, यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

आता पहलगाम हल्ल्याप्रकरणी मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेता समीर परांजपेने सविस्तर पोस्ट शेअर करत भारताचा नागरिक म्हणून एकूण १० मुद्दे मांडले आहेत. ते काय आहे पाहुयात…

अभिनेता समीर परांजपेची पोस्ट

बास झालं.. बास झालं..
झालं त्यानंतर संताप राग चिड द्वेष हे सगळं आहेच पण, आता पावलं उचलणार म्हणजे काय करणार? कंठस्नान वगैरे घालाल तुम्ही यात शंका नाही पण ही कीड संपवायला कायमची आणि ठाम पावलं उचलायची असतील तर भारताचा एक नागरिक म्हणून मला वाटतं…

१) भारताची उपराजधानी / उन्हाळी राजधानी श्रीनगर घोषित करा.

२) मार्च ते मे असे वर्षातले ३ महिने गृहमंत्र्यांच्या ऑफिसचा कारभार काश्मीरमधून चालावा. कारण एवढंच की नुसतं काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे भाषणात बोलून चालणार नाही ते दाखवून ही दिलं पाहिजे.

३) दरवर्षी संसदेच एक सत्र कायम काश्मीरमध्ये व्हावं.

४) राष्ट्रपतीभवन काश्मीरला हलवण्यात यावं.

५) स्थानिक असंतोषाच्या XXX XX@# . आता सरकार ठरवेल त्याच आणि इतर राज्यात जशा ओपन पद्धतीने गोष्टी होतात तशाच गोष्टी इथे होणार ज्यांना आक्षेप आहे त्यांनी उपाशी मरा. देशात अनेक गोष्टी दाबल्या जातात या छोट्या-मोठ्या असंतोषाच्या सुद्धा दाबून टाका.

६) ज्या व्हॅली मध्ये हे घडलं त्या पहलगाम व्हॅलीचे नाव ‘हिंदू व्हॅली’ असं करण्यात यावं. ही मागणी एवढ्याचसाठी की जे झालं ते पिढ्यान् पिढ्या आंधळ्या हिंदू जनतेला कळत राहावं.

७) मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन काश्मीरमध्ये करावं अनायसे गृहमंत्र्यांचे सुपुत्र आयसीसी चेअरमन आहेत त्यामुळे हे होऊच शकतं. तसं इन्फ्रा नसेल तर उभं करा.

८) RSS ने दसरा संचलन दर २ वर्षांनी नागपूर ऐवजी काश्मीर मध्ये करावं.

९) या प्रसंगानंतर पर्यटक रोडवण्याची शक्यता आहे ते होऊ नये यासाठी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करा. देशातले झाडून सगळे VIP जे ३ दिवस अंबानींच्या लग्नात पैसे घेऊन घरचं लग्न असल्यासारखे नाचले होते ते सगळे उत्तम पैसे देऊन आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेऊन या महोत्सवासाठी काश्मीरमध्ये आणा राज्याचे आणि देशाचे ॲम्बेसेडर म्हणून. सोबत सर्व इस्लामी देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करा.

१०) आर्मी चीफ यांचे ऑफिसचा कारभार देखील काही महिने काश्मीर मधून चालावा.

तसंही भरमसाठ कर देतोच आहोत आम्ही पण या सगळ्यासाठी जो काही तिजोरीवर खर्च येईल तो आमच्यावर कर रूपाने टाकलात तरी आमची हरकत नाही पण हे एवढं कराच. हे सगळं किंवा यातलं काही टक्के जरी झालं तर RDX आणि हत्यारे वगैरे सोडा, साधी टाचणी सुद्धा या राज्यात पोहोचू शकत नाही याची मला देशाचा नागरिक म्हणून खात्री आहे.
जय हिंद. जय हिंदू

दरम्यान, समीर परांजपेच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “खूप समर्पक मुद्दे आहेत”, “सर मी तुमच्याशी सहमत आहे”, “तू खूप छान आणि योग्य ते विचार मांडले आहेत… हे व्हायलाच पाहिजे तरच भ्याड हल्ले थांबतील” अशा प्रतिक्रिया युजर्सनी समीरच्या पोस्टवर दिल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांना देखील टॅग केलं आहे.