‘चार दिवस सासूचे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘सख्या रे’, ‘वहिनीसाहेब’ अशा मराठी मालिकांमधून आणि अनेक हिंदी मालिकांमधून रोहिणी हट्टंगडी घराघरांत पोहोचल्या. पण, याबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपट आणि नाटक यांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी टेलिव्हिजनमध्ये काम करावंसं नाही वाटत, असे म्हटले आहे.

काय म्हणाल्या अभिनेत्री?

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सिनेमाच्या तुमच्या करिअरकडे या टप्प्यावर कसं बघता? की जसं काम येईल तसं मी करेन आणि मी एन्जॉय करेन किंवा नाटकाकडेच जास्त लक्ष देईन की असं काही ठरवलेलं नाही? यावर बोलताना रोहिणी हट्टंगडी यांनी म्हटले, “असं काही आधीही ठरवलं नव्हतं की कोणत्यातरी एकाच माध्यमात काम करायचं. ‘खानदान’ नावाची सीरियल केली होती, तेव्हापासून मी टेलिव्हिजन करतेय. माझ्या करिअरमध्ये एका माध्यमात काम नाहीये म्हणून दुसरीकडे केलंय असं कधी झालं नाहीये. फक्त आता वयानुसार, थकण्यानुसार म्हणा आता टेलिव्हिजन करावसं वाटत नाही. कारण टेलिव्हिजनमध्ये फार कमी समाधान मिळतं.”

“काम करण्याची जी परिस्थिती आहे ती माझ्यासाठी अनुकूल नाहीये, असं मला स्वत:ला वाटतं. माझ्याकडे एखादं नाटक असेल आणि एखाद्या मालिकेत काम करण्यासाठी विचारले तर मी नाटक करेन. जरी ती मालिका फार जास्त काळ चालणारी असेल तरी मी नाटक करेन. नाटकाचे कितीही कमी प्रयोग झाले तरी त्यात मला समाधान मिळतं. कारण टेलिव्हिजनमध्ये आज काय सीन करायचा आहे, याबद्दल माहिती नसते किंवा रात्री मला सांगण्यात येतं की उद्या सकाळी आठ वाजताची शिफ्ट आहे. हे नाही जमत मला. मग एकमेकांना दोष देण्याचा खेळ सुरू होतो; हे चक्रच आहे.”

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांचे साडू आहेत प्रसिद्ध अभिनेते, दोघांनी एकत्र केलंय काम, तुम्ही त्यांचे ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

“पूर्वी हिंदीमध्ये हे जरा जास्त होतं. मला वाटतं ‘डोर’ नावाच्या एका हिंदी मालिकेत मी काम करत होते. सोमवारी आम्हाला बोलवलं, ९ वाजताची शिफ्ट होती. ९ वाजता आलो, ११ वाजेपर्यंत खूप आरामात तयार झालो. आम्ही तयार झालो तरी सीन नाही आला. विचारलं तर, अजून सीन यायचा आहे असं सांगितलं. मग म्हटलं, कधीचा? तर उद्याचा, असं उत्तर मिळालं. ती सीरियल बंद झाल्यानंतर मराठी मालिकेमध्येच काम केलं होतं. त्यावेळी मराठीमध्ये चांगली परिस्थिती होती. आता तिथेपण हिंदीसारखीच परिस्थिती झाली आहे.”

दरम्यान, रोहिणी हट्टंगडी यांचे ‘चारचौघी’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळत आहे.