गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारी सीआयडी ही मालिका आज प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. या मालिकेमधील सर्वच पात्रांचे लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान आहे. पण सीआयडीच्या एसीपी प्रद्युम्न यांचं एक विशेष स्थान आहे. ‘कुछ तो गडबड है दया’ ही ओळ ऐकल्यानंतर, सर्वात आधी मनात येणारी व्यक्ती म्हणजे एसीपी प्रद्युम्न. अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका साकारून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
१९९८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने २० वर्षे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर २०१८ मध्ये ही मालिका बंद करण्यात आली. पण लोकांच्या मागणीनुसार निर्मात्यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा मुख्य पात्रांसह सीआयडी परत आणण्याचा निर्णय घेतला. ‘सीआयडी’ पुन्हा सुरू झाला आणि त्याची सुरुवातही चांगली झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘एसीपी प्रद्युम्न’चे पात्र मरणार आहे आणि शिवाजी साटम या मालिकेतून निरोप घेणार आहेत.
यावर आता स्वत: शिवाजी साटम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत, शिवाजी साटम यांनी भाष्य केले की, सध्या ते रजेवर आहेत. शिवाय मालिकेतील निरोपाच्या वृत्तांबद्दल त्यांना माहिती नसल्याचेही त्यांनी म्हटलं. याबद्दल शिवाजी साटम म्हणाले की, “हे पात्र शोमधून बाहेर पडेल की नाही याबद्दल मला वैयक्तिक काही माहित नाही. सध्या मी सुट्टीवर आहे आणि आनंद घेत आहे. मला सीआयडीच्या आगामी चित्रीकरणाबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.”

शिवाजी साटम यांना जगभरात एसीपी प्रद्युम्न म्हणूनच ओळखलं जातं इतकी त्यांची लोकप्रियता आहे. ‘कुछ तो गडबड है’ हा त्यांचा डायलॉग तर तुफान व्हायरल झाला. आजही यावर मीम्स आणि जोक्स व्हायरल होत असतात. दरम्यान, हे मुख्य पात्रच शोमधून बाहेर पडलं तर मग मालिका बघण्यात काही रस नसणार अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता ‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार का? हे येत्या भागांमधून समोर येईलच.
दरम्यान, १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी यांच्याबरोबरच इतर सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. या मालिकेमधील ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया तोड दो दरवाजा’ हे डायलॉगही प्रचंड गाजले.