Suraj Chavan हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्य पर्वाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. आता त्याच्या या विजयानंतर आईची आठवण येत असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.

सूरज चव्हाणने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तू अरबाज, वैभवला टास्कमध्ये अनेकदा हरवलं आहेस. तू सगळ्यात तादकवान होतास, असे म्हटले जायचे. त्याबाबत तुला काय वाटतं, या प्रश्नावर बोलताना सूरजने म्हटले, “त्यांनी कितीही बॉडी बनवली असली तरी ही ताकद शेळीचं दूध पिऊन आलेली आहे. आप्पाकडे ५० शेळ्या होत्या. आप्पा त्यांना रानात घेऊन जायचा आणि त्या शेळ्या अशा होत्या की, आप्पा आधीच घरी आला तरीही त्या चरून मगच घरी यायच्या”, अशी आठवण सूरजने सांगितली आहे.

आईविषयी काय म्हणाला सूरज?

पुढे बोलताना त्याने, “माझी आई खूप भोळी होती. तिला पार्वती आणि बाप्पानं स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं. तिचा मुलगा साधा अन् भोळा आहे. तो सगळ्यांची मनं कशी जिंकतो हे तिला माहीत होतं. माझ्या आईची मला आठवण येते. ती आज आली असती ना, तर मी खूप नाचलो असतो. माझ्या गावात पाण्याची सोय नाही. माझी आई खूप लांबून पाणी आणायची. त्याबद्दल मला वाईट वाटतं”, असे म्हणत आईची आठवण येत असल्याचे सांगितले.

हेही वाचा: Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”

दरम्यान, सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. कॉमेडी व्हिडीओच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. त्याच्या वेगळेपणामुळे त्याला बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याला बिग बॉसमध्ये पाहिल्यानंतर अनेकांनी ट्रोल केले मात्र सूरज चव्हाणने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि बिग बॉस मराठी ५ चे विजेतेपद पटकावले आहे. दिग्दर्शक व कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी, त्याच्यासाठी ‘झापुक झुपूक’ चित्रपट निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे. आता सूरज चव्हाणची पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.