‘लाखात एक आमचा दादा'( Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका विविध कारणांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सूर्याचे त्याच्या बहि‍णींप्रति असलेले प्रेम व काळजी, त्याने खांद्यांवर घेतलेली घराची जबाबदारी, त्याच्या बहि‍णींना सूर्याबद्दल असणारा आदर व सन्मान यांमुळे या मालिकेची प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक म्हणून गणना होते. त्याबरोबरच सूर्या आणि तुळजाची मैत्रीदेखील प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

माझी होशील का? सूर्याने प्रपोज करताच तुळजा…

झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला सूर्याचे संपूर्ण कुटुंब अंगणात एकत्र जमले आहे. त्यावेळी धनू म्हणते, “दादा, वहिनीला कसं प्रपोज केलं होतं ते करून दाखव चल लवकर.” त्यानंतर सूर्या आणि तुळजा सगळ्यांच्या मध्ये उभे राहतात. सूर्या तुळजाला म्हणतो, “तुळजा तुझ्यासाठीच मला नवं आयुष्य पेरायचं आहे. तू माझी होशील का? त्यानंतर तुळजा तिच्या खोलीत गेली असून, ती घाबरल्याचे दिसत आहे. ती स्वत:लाच विचारताना म्हणते, “सूर्या, खरंच माझ्या प्रेमात पडलाय की काय?” त्यानंतर सूर्या तिथे आला असून, तो तिला म्हणतो, “अगं, गंमत करीत होतो तुझी. मला माझी लहानपणाची तुळजा परत पाहिजे होती म्हणून मी हे सगळं करत होतो.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सूर्या आपल्या प्रेमात पडल्याच्या जाणिवेने तुळजा घाबरते”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्याच्या बहिणी सूर्याकडे तुळजाला प्रपोज करून दाखविण्याचा हट्ट करतात; मात्र सूर्या त्यांना नकार देतो. त्यानंतर त्या, त्याला बोलू नकोस, असे म्हणतात. त्यावर तो, तुम्हाला काय करायचं ते करा. मी चाललो, असे म्हणतो. त्याच्या या बोलण्यावर सूर्याच्या मामाची मुलगी, “काय तुमचा दादा; जरासुद्धा रोमँटिक नाही. त्याचा काही उपयोग नाही. काही करू शकत नाही तो. जाऊ द्या; सोडून द्या तुम्ही”, असे म्हणते. तिचे हे बोलणे ऐकल्यावर सूर्या, मी प्रपोज करून दाखवणार, असे म्हणतो. त्यानंतर तो स्वत:शी बोलताना म्हणतो की, तावातावात बोललोय मी खरं; पण जमेल ना मला?

हेही वाचा : Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

काही दिवसांपूर्वीच तुळजाला तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थचे सत्य समजले आहे. त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती वडिलांनी ठरविलेल्या लग्नमंडपातून सूर्याच्या मदतीने पळून गेली होती; मात्र तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचलाच नाही. जेव्हा सूर्या आणि तुळजा परत आले, त्यावेळी तिच्या वडिलांनी रागात तुळजा आणि सूर्याचे लग्न लावून दिले. त्यांच्या लग्नानंतरही ते सिद्धार्थचा शोध घेत होते. ज्यावेळी सिद्धार्थ तुळजाला फसवत असल्याचे समजले होते, त्यावेळी सूर्याने ही गोष्ट तुळजासमोर आणायचे ठरवले. आता सिद्धार्थचे सत्य तुळजासमोर आले आहे.

आता मालिकेत पुढे काय येणार? सूर्या आणि तुळजाचे मैत्रीचे नाते तसेच राहणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.