‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाइलमुळे मोठा ड्रामा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रिया मोठ्या हुशारीने अर्जुन- सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल चोरते आणि पुढे, ती सुभेदारांच्या घरी जायला निघते. परंतु, याचवेळी मालिकेत एक मोठा ट्विस्ट येतो. अर्जुन-सायली फाइल चोरणाऱ्या प्रियाला आधीच गाठतात आणि मूळ फाइलची अदलाबदल करतात. यामुळे सुभेदारांच्या घरी सायली-अर्जुनचं लग्न खोटं आहे असं सांगणारी प्रिया स्वत:च तोंडावर पडते.

प्रिया पूर्णा आजीला अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगून फाइल दाखवते. परंतु, सायलीने आधीच फाइल बदलल्यामुळे प्रिया पुन्हा एकदा सर्वांसमोर तोंडावर पडते. पूर्णा आजी प्रियाला सर्वांसमोर कानशिलात लगावते. एवढंच नव्हे तर कल्पना फोन करून रविराज किल्लेदारांना घरी बोलावते. यामुळे प्रियाची सगळ्या बाजूने कोंडी होते. यापुढे सायली-अर्जुनवर आरोप करायचे नाहीत असं प्रियाला स्पष्टपणे सांगितलं जातं. अर्थात पुन्हा एकदा घरातल्यांसमोर सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नात्यातला खरेपणा सिद्ध होतो आणि दोघंही सुटकेचा नि:श्वास सोडतात.

हेही वाचा : “डॅडा, बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?” ६ वर्षांच्या लेकीने प्रश्न विचारताच आदिनाथ कोठारेला उत्तर सुचेना, म्हणाला…

चैतन्यला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य माहीत असल्याने तो हा सगळा प्रकार पाहून थक्क होतो. नेमकं काय घडलं? अर्जुन सायलीने ती फाइल केव्हा आणि कशी बदलली? हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक असतो. त्यावर अर्जुन-सायली त्याला संपूर्ण घटनाक्रम सांगतात. यावर चैतन्य तुम्ही दोघं खरंच एक टीम आहात असं सायली-अर्जुनला सांगतो. आता हळुहळू अर्जुन-सायलीच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नात्यात दोघांना एकमेकांबद्दल खऱ्या भावना निर्माण होत आहेत.

सतत सोज्वळ सुनेसारखी वागणारी सायली आता अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीत बायकोसारखी हस्तक्षेप करू लागली आहे. “ऑफिसमध्ये कॉफी प्यायची नाही, डबा खाल्ला नाहीतर तुम्हाला घरी घेणार नाही” अशी दमदाटी सायली अर्जुनवर करते. सुनेचं हे रुप पाहून कल्पना देखील थक्क होते. या दोघांचं बॉण्डिंग पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो. तर, अर्जुन ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सायली पुन्हा त्याला व्हिडीओ कॉल करते. कॉल केल्यावर “मला आजूबाजूचं सगळं दाखवा, तुम्ही कॉफी पीत नाही ना” अशी चौकशी सायली अर्जुनकडे करते यावेळी अर्जुनने कॉफीचा मग लपवलेला असतो. परंतु, तेवढ्यात शिपाई येऊन “सर कॉफीचा कप कुठेय” असं विचारतो. हे सगळं सायली व्हिडीओ कॉलवर ऐकते आणि अजून भडकते.

हेही वाचा : ‘धर्मवीर २’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली! ‘हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’, सिनेमाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

सायली-अर्जुनमध्ये हे गोड रुसवे फुगवे पाहून चैतन्य देखील आनंदी होतो. आता हे दोघंही आपल्या मनातील भावना एकमेकांना केव्हा सांगणार की, त्याआधीच यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदारांसमोर येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीला आहे. परंतु, नव्याने चालू झालेली शिवानी सुर्वेची मालिका अगदी एका आठवड्यातच टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात या दोन्ही मालिकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.