‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांत अनेक नवनवीन ट्विस्ट आल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. प्रियाने सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल चोरली खरी पण, ऐनवेळी अर्जुनने प्लॅन करून प्रियालाच सुभेदारांसमोर तोंडावर पाडलं. यामुळे सर्वांच्या मनातून प्रिया उतरली. पूर्णा आजीने प्रियाला पुन्हा एकदा खोटेपणा केल्यामुळे सर्वांसमोर कानाखाली मारली. या सगळ्यामुळे रविराज किल्लेदार सुद्धा प्रियावर प्रचंड संतापले आहेत. ते लेकीशी एकही शब्द बोलायला तयार नसतात.

नागराज या सगळ्या गोष्टी जाऊन महिपत आणि साक्षी शिखरे यांना सांगतो. यावर साक्षी यापुढे कोणत्याही प्लॅनमध्ये प्रिया सहभागी नसेल असा निर्णय घेते. साक्षीचा निर्णय ऐकल्यावर प्रियाला प्रचंड राग येतो. ती साक्षीसह महिपत आणि नागराजला तुमचा चेहरा सर्वांसमोर उघड करण्याची धमकी देते. यानंतर महिपत प्रियाला मारण्यासाठी गुंडांना पाठवतो. या गुंडाच्या तावडीतून प्रिया कशीतरी सुटते आणि एक नवीन प्लॅन बनवते. प्रिया घरातून गायब होते… यामुळे सुमन तिला सर्वत्र शोधत असते. याबद्दल ती रविराज किल्लेदारांना कल्पना देते. यानंतर प्रियाची शोधाशोध सुरु होते. अशातच साक्षी- महिपत विरोधात एक व्हिडीओ बनवून प्रिया अर्जुन-सायलीला पाठवते. हा व्हिडीओ पाहून सुभेदारांना मोठा धक्का बसतो. या सगळ्यात सायली कुटुंबाच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहिल्याचं पूर्णा आजी पाहते. यामुळे आजीच्या मनात सायलीबद्दल आपुलकी निर्माण होते. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

हेही वाचा : अंबानींच्या ‘बांधणी’ ट्रेंडमध्ये सुंदर पैठणी नेसून पोहोचल्या रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंचीही ‘मामेरू’ समारंभाला हजेरी, व्हिडीओ व्हायरल

‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका म्हणून ओळखली जाते. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पाहातोय तो भावनिक क्षण ८ जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारणार आहे. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे.

खरंतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचच मन जिंकलेलं आहे. अगदी सायलीच्या निरागस स्वभावाच्या अर्जुनही प्रेमात पडला. पूर्णा आजीचं मतपरिवर्तन व्हायला मात्र प्रेक्षकांना खूपच वाट पहावी लागली. अनेक प्रसंगांमध्ये पूर्णा आजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा. मात्र, तरीही तिने सायलीला नातसूनेचा दर्जा कधीच दिला नाही. आता मात्र, पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्णा आजी घराची जबाबदारी सायलीवर सोपवणार आहे.

हेही वाचा : नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्…; पूजा सावंतचं लग्नानंतर प्रदर्शित होणार पहिलं गाणं! टीझर प्रदर्शित

‘ठरलं तर मग’ मालिकेतला हा हळवा क्षण ८ जुलैच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. आता पूर्णा आजीने सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं संपल्यावर सायली सुभेदारांपासून कशी वेगळी होणार हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. याशिवाय प्रियाने साक्षी व महिपतवर आरोप केल्यामुळे आश्रम केसला वेगळं वळण मिळेल का हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.