‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या दिवाळीचा सीक्वेन्स सुरू आहे. सुभेदारांच्या घरात सुद्धा मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अर्जुनने मधूभाऊ आणि आश्रमातील मुलांना घरी आणून सायलीला सरप्राईज दिलं होतं. मधूभाऊंसह आश्रमातील मुलांना घरी आलेलं पाहून सायली प्रचंड आनंदी होते. संपूर्ण कुटुंबासमोर ती अर्जुनचे आभार मानते. यानंतर आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही अर्जुनने आपल्यासाठी एवढं काही केलंय याबद्दल सायलीच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होते. तिलाही अर्जुनसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं वाटू लागतं. यासाठी सायली अर्जुनचा खास मित्र चैतन्यची मदत घेणार आहे. चैतन्य सायलीला अनेक पर्याय सुचवतो आणि तिला मदत करतो.
आता आगामी भागात चैतन्यच्या साथीने सायली अर्जुनला सरप्राईज देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. बेडरुममध्ये साधीशी सजावट करून ती मेणबत्त्या लावते. अर्जुन कामावरून घरी यायच्या वेळेस संपूर्ण खोलीत चैतन्य आणि सायलीने मिळून अंधार केलेला असतो. अर्जुनने खोलीत पाऊल ठेवताच सायली त्याला मेणबत्त्या पेटवून त्याला सरप्राईज देते. सायलीने केलेली संपूर्ण तयारी पाहून अर्जुन भारावून गेल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : करण जोहर बनवणार ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे खुलासा करत म्हणाला, “मी स्पष्टपणे…”
सायलीने दिलेल्या या गोड सरप्राईजमुळे अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं मालिकेत एक नवीन वळण घेणार आहे. त्यामुळे येत्या काळात ‘ठरलं तर मग’मध्ये कोणते ट्विस्ट येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच दिवाळी संपल्यावर मालिकेत पुन्हा एकदा कोर्ट केसचा सीक्वेन्स सुरू होऊन मधूभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुन प्रयत्न करणार आहे.