Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन विलास मर्डर केसचा खूप खोलवर जाऊन तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी त्याने स्वत: पोलिसांची भेट घेतल्याचं मालिकेत पाहायला मिळालं. विलासचा खून होण्याआधी तो जेलमध्ये होता. यानंतर त्याची सुटका करण्यात आलेली असते. आता जेलमधून विलासची बेल नेमकी कोणी केली याचा शोध सध्या अर्जुन घेत आहे. तपास करताना अर्जुनला रविकांत देशमुख यांनी विलासची बेल केल्याचं समजतं. आता अर्जुन या केसबद्दलची आणखी माहिती कशी मिळवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
एकीकडे अर्जुन मधुभाऊंच्या केसचा तपास करत असताना दुसरीकडे प्रिया वेगळंच कारस्थान रचत असते. प्रियाला काही करून सुभेदारांची सून व्हायचं असतं. त्यामुळे अर्जुनशी नाही पण, आता अश्विनशी तरी लग्न करायचं असा प्लॅन प्रिया बनवते. प्रियाने रडून, नाटक करून अश्विनला आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि आता येत्या भागात अश्विन प्रियाशी लग्न करण्याचा निर्णय प्रताप-कल्पनाला म्हणजेच आपल्या आई-वडिलांना सांगणार आहे.
अश्विन बाबांना विचारतो, “तन्वीशी लग्न करण्याचा विचार चुकीचा आहे का डॅड?” प्रताप काहीतरी बोलणार इतक्यात सायली त्याच्या खोलीबाहेर येऊन धडकते. यामुळे अश्विन तिच्यावर प्रचंड संतापतो. कल्पना तिला हात धरून खोलीच्या बाहेर काढते. तर, अश्विन सुद्धा सायलीला घालून-पाडून बोलतो.
“ही आपल्या घरावर नजर ठेवून असते, तू काय-काय ऐकलंस सांग आधी…”, असं म्हणत तो आपल्या वहिनीचा अपमान करतो. हे सगळं दरवाजात उभा असलेला अर्जुन ऐकतो. सायली एकही शब्द उलट न बोलता अश्विनचे सगळे आरोप ऐकून घेते व त्यानंतर “मी यातलं काहीच केलेलं नाहीये” असं त्याला सांगते.
आता अश्विनचा प्रियाशी लग्न करण्याचा निर्णय जेव्हा अर्जुनला समजेल तेव्हा तो भावाला काय सल्ला देणार, या लग्नाला अर्जुन विरोध करणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, अर्जुन केसचा तपास करेपर्यंत सायलीने मधुभाऊंना जानकीच्या घरी राहण्यासाठी पाठवलं आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन्ही मालिकांचे महासंगम १६ मार्चपर्यंत पार पडणार आहेत. आता या काळात मालिकेत कोणते ट्विस्ट येणार? मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुनला आणखी कोणता पुरावा मिळणार? जानकी-सायली मिळून ऐश्वर्या व अन्य खलनायकांना कशी अद्दल घडवणार? या सगळ्या गोष्टी मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.