‘ठरलं तर मग’ ही मालिका आताच्या घडीला महामालिका म्हणून ओळखली जातेय. गेल्या दीड वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतदेखील आपलं अव्वल स्थान राखून ठेवलंय. अशा या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा असल्याने सगळेच या मालिकेसह त्यातील कलाकारांवरदेखील मनापासून प्रेम करतात.

नुकतेच ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले. यानिमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान, मालिकेत साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालवने अल्ट्रा मराठी बझ या चॅनलशी गप्पा मारल्या.

हेही वाचा… ‘नखरेवाली’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित, ‘गुलाबी साडी’ गाण्याशी आहे खास कनेक्शन?

या मुलाखतीत मालिका पाहिल्यावर केतकीच्या लेकीची काय प्रतिक्रिया असते हे अभिनेत्रीला विचारल्यावर, ती म्हणाली की, “माझे आणि चैतन्यचे काही सीन्स सुरू होते तेव्हा एका सीनमध्ये मी चैतन्यला मिठी मारली आणि हे तिने पाहिलं. तर ते पाहून ती रडली आणि मला म्हणाली, अगं आई असं नको करूस. तू चैतन्यबरोबर नको जाऊस. बाबाला सोडून नको जाऊस आणि ती हे सगळं खूप गंभीरपणे म्हणत होती. तेव्हा मला थोडं टेन्शन पण आलं आणि तिची मला मजाही आली. मग मी तिला म्हटलं की तू मालिका नको बघत जाऊस. नाहीतर तिला असं वाटेल की आई हे सगळं काहीतरी करत असते.”

हेही वाचा… “…घाबरून चालणार नाही”, हिना खानने शेअर केली तिच्या ‘कर्करोगाचा प्रवास’ सांगणारी पोस्ट , म्हणाली…

केतकी पुढे म्हणाली, “तिला असं छान वाटतं की टीव्हीवर माझी आई दिसते. मग बाहेर असताना कोणीतरी माझ्याबरोबर फोटो काढायला आलं तर ती विचारते की, आई ते तुझी मालिका बघतात का गं? मग मी तिला सांगते हो बघतात. तिला हे सगळं बघून मजा वाटते.”

हेही वाचा… सोनाक्षी सिन्हाने अनवाणी चालत पती झहीर इक्बालबरोबर शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, म्हणाली, “जेव्हा तुम्ही…”

दरम्यान, ठरलं तर मग या मालिकेत साक्षी म्हणजेच केतकी पालव खलनायिकेची भूमिका साकारतेय. तर जुई गडकरी आणि अमित भानुशाली यात प्रमुख भूमिका साकारतायत. तसंच, प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, मयूर खांडगे या कलाकारांच्यादेखील यात निर्णायक भूमिका आहेत.