Star Pravah Parivaar Puraskar : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार २०२५ हा भव्यदिव्य सोहळा नुकताच पार पडला. यंदा वाहिनीवर सुरू असणाऱ्या एकूण १४ मालिकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे यंदाच्याही वर्षी टीआरपीवर अधिराज्य गाजवणारी ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सलग दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. याशिवाय टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका सलग दोन वर्षे पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे या मालिकेतील बहुतांश कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार मिळतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, ‘महाराष्ट्राची महामालिका’ आणि ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका -प्रिया’ हे दोन पुरस्कार वगळता या मालिकेतील अन्य कोणत्याही कलाकाराला एकही पुरस्कार मिळालेला नाही. यामुळे मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली या दोन पात्रांना वैयक्तिकरित्या सन्मानित करायला हवं होतं’, असं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पुरस्कार सोहळा संपल्यावर इन्स्टाग्रामवर “स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ हा सोहळा तुम्हाला कसा वाटला? असा प्रश्न प्रेक्षकांना पोस्टद्वारे विचारला होता. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एका युजरने लिहिलंय, “अजिबात आवडला नाही सायली-अर्जुनला एकही पुरस्कार मिळाला नाही”, तर दुसरी युजर म्हणते, “मी ‘ठरलं तर मग’ मालिकेची चाहती नाही पण, सायली-अर्जुन अवॉर्ड डिझर्व्ह करत होते…निदान वाहिनीने त्यांच्यासाठी वेगळे विभाग करणं अपेक्षित होतं.”
याशिवाय अन्य नेटकरी लिहितात, “सायली-अर्जुनला एकही पुरस्कार दिला नाही किती अनफेअर आहे हे”, “महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीकडे दुर्लक्ष केलं”, “कार्यक्रम अजिबात आवडला नाही सायलीला सर्वोत्कृष्ट मुलगी पुरस्कार मिळाला हवा होता”, “मधुभाऊंसाठी सायली किती प्रयत्न करते तिला पुरस्कार का नाही दिला?”, “सगळं छान अवॉर्ड्स चुकीचे दिले” अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.


दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी तर, अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे.