अभिनेत्री वीणा जगताप(Veena Jagtap) ही सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत अभिनय करताना दिसत आहे. याआधी बिग बॉसमुळे ती चर्चेत आली होती. वीणा जगताप बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. आता एका मुलाखतीदरम्यान तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत वक्तव्य केले आहे.

“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना

अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब विथ सुरेखा तळवलकर’ या यूट्यूब चॅनेलला तिने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बिग बॉस संपल्यावर जेव्हा तू बाहेर आलीस तेव्हा तू कौतुक आणि टीका दोन्ही अनुभवलं असशील, तर तू त्याचा कसा सामना केला? यावर बोलताना वीणा जगतापने म्हटले, “प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा पहिली मालिका केली, तेव्हा लोकप्रियता थोडी कमी होती. बिग बॉसनंतर लोकप्रियता काय असते हे कळलं, पण त्याबरोबरच ट्रोलिंगदेखील आलं. लोकप्रियतेसाठी, ट्रोलिंगसाठी मी तयारच नव्हते. बाहेर आल्यानंतर लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं, पण जेव्हा ट्रोलिंग व्हायला लागलं तेव्हा तेसुद्धा मी खेळाडू वृत्तीने घेतलं.”

“कधी कधी लोक एक लाइन असते ती क्रॉस करतात. मम्मीला, बहिणीला शिव्या लिहिल्या. एका फॅन पेजने मला मेसेज केला की, तू मरत का नाहीस? माझ्या आईलासुद्धा मेसेज यायचे की तुमची मुलगी मरत का नाही? मला असं वाटतं की, अशा प्रकारे कोणाला बोलू नये. कारण तुम्हाला माहीत नाही की घरची काय परिस्थिती आहे किंवा बहुतेक तीच व्यक्ती आहे जी कमावती आहे. माझे वडील २००९ मध्ये गेले. त्यानंतर माझ्या आईने खूप संघर्ष केला. आमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आम्ही कमवायला लागलो. जेव्हा मी या फिल्डमध्ये संघर्ष करायला लागले तेव्हा माझी आई मला म्हणायची की, जॉब कर ना; एक विशिष्ट रक्कम तुझ्या हातात राहील. तिला काही नको असतं. तिची हौसदेखील संपली आहे, इतका संघर्ष तिने पाहिला आहे. त्यानंतर जर तुम्ही तिला म्हणत असाल की तुमची मुलगी मरत का नाही? पण ते सगळं मी खेळाडू वृत्तीने घेतले. पण, काही गोष्टी मनाला लागतात. कारण माझ्या आई-वडिलांवर बोललं गेलं. माझ्या बहिणीचं सोशल मीडिया अकाउंट पब्लिक होतं, मग तिने ते प्रायव्हेट केलं. माझी एकच विनंती आहे की, प्लीज कोणाला ट्रोल करू नका. तुमच्या घरीही महिला आहेत, याचं जरा भान ठेवा; असे काही मेसेज आहेत जे मी कॅमेरा बंद झाल्यावर सांगेन.”

हेही वाचा: अमिताभ बच्चन, शाहरुख- सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता

आता तू त्यातून बाहेर आली आहेस का? या प्रश्नावर उत्तर देताना वीणा जगतापने होकार देत म्हटले, “आता पूर्णत: त्यातून बाहेर आली आहे. बिग बॉस हा शोच असा आहे, ज्यामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्यावेळी लोकांनी मला खूप ट्रोल केलं किंवा समज दिली असं म्हणूयात. पण, जेव्हा चांगलं झालं तेव्हा लोकांनी मला स्वीकारलं, कौतुक केलं. मला मेसेजदेखील यायचे की वीणा मला हे नव्हतं आवडलं; तेव्हा मी तुला अनफॉलो केलं होतं, पण मी आता तुला फॉलो करत आहे कारण आता तू आवडत आहे आणि तुला तुझी चूक समजली आहे. माझी ही सवय आहे की, मी सॉरी म्हणण्याने छोटी होईल असे मला वाटत नाही, त्यामुळे मी सॉरी म्हणते. परत हेच म्हणेन की, प्लीज कोणाला ट्रोल करू नका आणि मुलींबाबत घाण घाण लिहू नका, कारण ते खरंच मनाला खूप लागतं.”

दरम्यान, वीणा जगताप सध्या ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.