लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व तिचा पती विवेक दहिया सध्या युरोपमध्ये फिरायला गेले आहेत. आपल्या ट्रिपमधील सुंदर फोटो व व्हिडीओ ते सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर करत आहेत. अशातच हे दोघे बुधवारी फ्लॉरेन्स याठिकाणी फिरायला गेले होते. पण तिथे गेल्यावर त्यांच्याबरोबर अशी घटना घडली की त्यांचा व्हेकेशनचा आनंद नाराजीत बदलला. त्यांचे पासपोर्ट, पर्स आणि १० लाख रुपये किमतीच्या इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या.

विवेक दहियाने त्यांच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. “आमची ट्रिप खूप चांगली सुरू होती, शिवाय ही एक घटना वगळला. आम्ही काल (बुधवारी) फ्लॉरेन्सला पोहोचलो आणि तिथे एक दिवस राहायचं ठरवलं. आम्ही राहण्यासाठी जे ठिकाण निवडलं होतं ते पाहायला गेलो आणि आमचे सर्व सामान बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये तसेच ठेवले. पण जेव्हा आम्ही आमचे सामान घेण्यासाठी परत आलो, तेव्हा समोरचं दृश्य पाहून आम्हाला धक्का बसला. कारची काच फोडून आमचे पासपोर्ट, पर्स, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि जवळच्या मौल्यवान वस्तू सगळंच चोरीला गेलं. कारमध्ये फक्त आमचे काही जुने कपडे आणि खाण्याच्या वस्तू उरल्या होत्या,” असं विवेक दहियाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं.

फक्त दोन कोटींचे बजेट अन् चित्रपटाने ४२ वर्षांपूर्वी कमावले होते १०० कोटी, तुम्ही पाहिलाय का हा बॉलीवूड सिनेमा?

पोलिसांनी मदत केली नाही – विवेक

या घटनेनंतर विवेक व दिव्यांका यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. “आम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमची तक्रार घेण्यास नकार दिला. कारण त्या विशिष्ट भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे ते आम्हाला मदत करू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं. तसेच पोलीस स्टेशन संध्याकाळी सहा वाजता बंद होते आणि त्यानंतर ते कोणतीही मदत करू शकत नाही, असं ते म्हणाले. आम्ही दूतावासाशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तेही बंद झाले होते,” असं विवेक म्हणाला.

फक्त तीन कलाकार, १५ दिवसांत शूटिंग अन्…, ‘या’ भयपटाने केलेली बक्कळ कमाई, कुठे पाहता येणार सिनेमा? जाणून घ्या

दिव्यांका आणि विवेक लवकरच त्यांची ट्रिप संपवून भारतात परतणार आहेत आणि या घडलेल्या प्रकरणात त्यांना भारतीय दूतावासातील उच्च अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा असं वाटतंय. “आम्ही फ्लॉरेन्स जवळ एका छोट्या गावात आहोत. हॉटेलचे कर्मचारी आम्हाला मदत करत आहेत, पण आम्हाला तातडीने दूतावासाच्या मदतीची गरज आहे. आम्हाला तात्पुरते पासपोर्ट आणि भारतात परत येण्यासाठी दूतावासाकडून मदतीची गरज आहे, कारण सध्या भारतात परतायला आमच्याकडे काहीच नाही,” असं विवेक म्हणाला.