सिनेविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी यश आणि अपयश दोन्ही पाहिलं. इंडस्ट्रीत एकेकाळी आघाडीवर असलेले आणि आता सिनेविश्वापासून दूर गेलेले अनेक सेलिब्रिटी आहेत. तब्बल ७०२ चित्रपटांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींमुळे व्यसनाधीन झाली आणि त्याचा तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला.
सिनेविश्वातील कलाकारांचे आयुष्य खूप ऐशोआरामाचं असतं, त्यांना काहीच समस्या नसतात; असं अनेकांना वाटतं. मात्र बऱ्याच कलाकारांना आयुष्यात समस्या येतात, काही वेळा त्या समस्या सुटणाऱ्या असतात, तर काही वेळा त्याचे परिणाम खूप वाईट होतात. अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात जिला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
या अभिनेत्रीचं नाव उर्वशी. तिने प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण त्याव्यतिरिक्त, तिने कन्नड, तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. एकेकाळी दाक्षिणात्या सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री अशी ओळख असलेली उर्वशी आता सिनेविश्वापासून दूर आहे.
१९ वर्षांपूर्वी जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार
हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी उर्वशी तेलुगू सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली नाही, परंतु काही चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या. ती तेलुगू प्रेक्षकांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवी दिल्ली’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केलं होतं. आपल्या अभिनय कौशल्याचा सिनेविश्वात ठसा उमटवणाऱ्या उर्वशीने २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला होता.
७०२ सिनेमांमध्ये केलं काम
उर्वशीचं खरं नाव कविता मनोरंजिनी आहे. तिचा जन्म केरळ येथील कोल्लम जिल्ह्यात झाला. बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी उर्वशी फार कमी कालावधीत आघाडीची अभिनेत्री झाली. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने जवळपास ७०२ चित्रपटांमध्ये काम केलं. अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने चिरंजीवी, बालकृष्ण, रजनीकांत, कमल हासन, विष्णुवर्धन, अंबरीश, रविचंद्रन, रमेश अरविंद, मोहनलाल, मामूट्टी, डॉ. राजकुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर चित्रपट केले.
अल्पावधीतच स्टारडम मिळविणाऱ्या उर्वशीला तिच्या करिअरच्या शिखरावर असताना अनेक वैयक्तिक समस्यांना सामोरं जावं लागलं. तिला दारूचं व्यसन जडलं आणि परिणामी तिचे फिल्मी करिअर उद्ध्वस्त झाले. उर्वशीने २००० साली मनोज के जयनशी लग्न केलं; पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. दोघांना एक मुलगी होती. पतीमुळे उर्वशीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शेवटी तिने घटस्फोट घेतला आणि एकटीच मुलीचा सांभाळ करू लागली.
उर्वशीने २०१३ मध्ये ४४ व्या वर्षी चेन्नईतील उद्योगपती शिवप्रसाद यांच्याशी दुसरं लग्न केलं. तिला व शिवप्रसाद यांना एक मुलगा असून त्याचे नाव इहान प्रजापती नावाचा मुलगा आहे. उर्वशी आता फिल्मी दुनियेपासून दूर असून आनंदाने संसार करतेय.