वर्षां उसगावकर

चित्रपट कथा – पटकथा, संवाद लेखक आणि निर्माते अण्णासाहेब देऊळगावकर यांचे २२ ऑगस्ट रोजी जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे, यानिमित्ताने..

ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
Manoj Bajpayee on being stereotyped as middle class No director could think of me as a rich guy experts share ways to deal with rejection
“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
ajit pawar secular solapur speech
“भाजपसोबत सत्तेत असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्षच”, अजित पवार यांचा दावा
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध

माझी अण्णासाहेब देऊळगावकर यांच्याशी पहिली भेट कुठं झाली आणि कशी झाली हे अगदी नेमकं सांगता आलं नाही, तरी जेव्हा त्यांना मी भेटले तेव्हापासूनच त्यांची आपल्या कामावरची निष्ठा, चांगलं काम करण्यासाठीची असोशी, त्यांचे मराठी चित्रपटावरचे उत्कट प्रेम, चित्रपट रसिकांची आवड ओळखण्याचा दृष्टिकोन हे सगळं माझ्या खूपच चांगलं लक्षात आलं. ती पिढीच वेगळी होती असं म्हटलं पाहिजे आणि तसा प्रत्यय अनेक वेळा यायचा.

अण्णासाहेबांनी लिहिलेला ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ (१९८७) हा माझा ‘गंमत जंमत’नंतरचा दुसराच चित्रपट होता. आणि तशी मी नवीन असल्याने मराठी चित्रपटसृष्टीबाबत मला फारशी माहिती नव्हती. त्यामुळे अण्णासाहेबांविषयीही फारसं काही ऐकलं नव्हतं. त्यांची वैशिष्टय़ं काय आहेत, त्यांचे चित्रपटसृष्टीतील स्थान काय आहे, त्यांचा अनुभव काय आहे, ते कथा – पटकथा, संवाद लेखनाबरोबरच गीतकारही आहेत याची मला कल्पना नव्हती. आणि मी हा चित्रपट स्वीकारताना अण्णासाहेब हजर नव्हते. तेव्हा माझे नाटकाचे प्रयोग सुरू होते.  एका प्रयोगाला या चित्रपटाचे दिग्दर्शक एन. एस. वैद्य आणि निर्माते हेमंत वीरा व मेघजीभाई वीरा मला भेटायला आले. मला या चित्रपटाची गोष्ट आवडली आणि मी होकार दिला. सासू आणि सून यांच्यातील वादाचीच ही गोष्ट आहे, पण सगळी हाताळणी मजेशीर होती. सासूच्या भूमिकेत दया डोंगरे, तसेच माझ्या पतीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज, त्याचप्रमाणे इतर भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, जयराम कुलकर्णी वगैरे होते. कोल्हापूरला या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एक उंचसा माणूस सेटवर आला, ते होते अण्णासाहेब देऊळगावकर! तेव्हा त्यांची माझी पहिली भेट झाली, तेव्हाच ते खूप मोठय़ा वयाचे होते. त्या पहिल्या भेटीतच ते अतिशय मनमोकळ्या स्वभावाचे तसंच प्रेमळ आहेत याची कल्पना आली. ते आपल्यासमोर बोट दाखवत बोलत ते मला विशेष वाटलं. त्यांनी मला त्या दिवशी चित्रित होत असलेला प्रसंग कसा आहे याची व्यवस्थित कल्पना दिली. ते आणि दिग्दर्शक एन. एस. वैद्य यांनी तत्पूर्वी काही चित्रपट एकत्र केल्याने त्यांची जोडी चांगली जमली होती आणि त्याचा लाभ आम्हा कलाकारांना आणि अर्थातच त्या चित्रपटालाही होई.

याच चित्रपटात सासू आणि सून यांच्यातील भांडणाचा एक प्रसंग आहे. सासू म्हणते, तू आत आलीस तर याद राख. त्यावर सून म्हणते, तू कशी अडवते ते मी बघते. आणि सासूला ढकलून ती आत घरात येते. मग या दोघी एकमेकींच्या अंगावर कांदे, बटाटे, भांडी वगैरे वगैरे फेकून मारतात. मला हे दृश्य थोडं अतिरंजित वाटलं. अशी कोणती सासू आणि सून भांडते काय? असा माझा प्रश्न होता आणि मी तसं अण्णासाहेबांना म्हणाले. ते म्हणाले तू हे दृश्य रंगवून कर, बघ महिला प्रेक्षकांना हे कसं  आवडते ते? तरी मला ते, सासू सुनेला म्हणते मी तुझं तोंड पाहणार नाही, मग सून म्हणते मी तुझं थोबाड पाहणार नाही. हा वाद असाच वाढत जातो. हे थोडं अति वाटलं. मी हा प्रसंग अगदी मनापासून साकारला. लेखक आणि दिग्दर्शकांनी त्यामागे निश्चित काही विचार केला असेलच असं मी मानलं. त्यानंतर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा पुणे शहरातील प्रभात थिएटरमध्ये मी आवर्जून गेले असता माझ्या लक्षात आलं की, महिला प्रेक्षक हाच प्रसंग मोठय़ा प्रमाणावर एन्जॉय करताहेत. उचलून घेत आहेत. आणि सर्वच शहरांत, ग्रामीण भागात या प्रसंगाला प्रचंड दाद मिळतेय हेही समजलं. ते मी प्रत्यक्ष अनुभवल्यानं अण्णासाहेबांच्या आत्मविश्वासाला मी मनोमन दाद दिली. ते अतिशय निष्पाप स्वभावाचे होतेच, त्यांना प्रेक्षकांना नक्की काय आवडेल याची कल्पना असे. कधी कोणाशी कसला वाद नाही, कसले राजकारण नाही, छक्के पंजे नाहीत, त्यामुळे त्यांच्याशी अधिक मोकळेपणानं गप्पा होत.

त्यांचीच कथा पटकथा संवाद असलेल्या आणि एन. एस. वैद्य दिग्दर्शित ‘नवरा बायको ‘ (१९८९) या चित्रपटात मी भूमिका साकारलीय. छगन भुजबळ या चित्रपटाचे निर्माते होते हे विशेष. या चित्रपटाची संकल्पना गमतीदार होती. पती आणि पत्नी सारखे भांडत असतात, तेव्हा विष्णुदेव त्यांच्या स्वप्नात येतो आणि आत्म्यांची अदलाबदल करतो. ते दोघंही हे आव्हान स्वीकारतात. सुरुवातीला त्यांना जुन्या सवयी बदलल्या आणि नवीन सवयी लागल्याचं बरं वाटतं, पण नंतर लक्षात येत जातं की हे सोपं नाही. प्रत्येकानं आपलं काम करावं आणि त्यात आनंद घ्यावा. यात अशोक सराफ माझ्या पतीच्या भूमिकेत आहे, नितीश भारद्वाज विष्णूच्या भूमिकेत आहे. आम्ही या भूमिकांचा मनापासून आस्वाद घेतला. अण्णासाहेबांचा सहवासही अनुभवला.

अण्णासाहेबांचे आणखीन एक विशेष म्हणजे, ते एखाद्याला मानसपुत्र मानत. आणि त्याला भरपूर सहकार्य करीत, आशीर्वाद देत. महेश कोठारे त्यांचा मानसपुत्र होता. मग नितीश भारद्वाज होता. ‘नवरा बायको’च्या निर्मितीच्या काळात त्यांचं ते नातं जमलं. त्यानंतरही नितीश त्यांना आवर्जून फोन करून अन्य एखाद्या चित्रपटाबाबत अथवा व्यक्तिरेखेबाबत विचारत असे. यानंतर माझा त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला नाही. पण अन्य चित्रपटांत मी व्यग्र असताना त्यांच्याबाबत काही माहिती मिळे इतकंच. पण नंतर तेही कमी होत गेलं. आपण आपल्या कामात मग्न झालो की काहींशी आपला संपर्क तुटत जातो आणि अशा वेळी आपण वेळ काढून अशा व्यक्तींना भेटायला हवे अशी समजही मला तेव्हा आली नाही. याचं कारण म्हणजे, मी तशी वयाने मोठी झाले नव्हते. पण त्यांच्या निधनानंतर काही वर्षांंनी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या वतीने अण्णासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांच्या मुलीनं म्हणजे प्रीतीताई वडनेरकर यांनी लिहिलेल्या ‘मायाबाजार’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मी ते पुस्तक चाळलं, थोडं वाचलं आणि त्यानंतर त्यांच्यावरचा माहितीपट पाहिला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. अखेरच्या काळात ते व्हीलचेअरवर असताना आपण त्यांना भेटायला गेलो नाही याची मला खंत वाटली. वाईट वाटलं. त्यांनी चित्रपटसृष्टीत खाल्लेल्या खस्ता, ‘लेक चालली सासरला’, ‘धूम धडाका’, ‘साखरपुडा’ इत्यादी मराठी चित्रपटांचं केलेलं लेखन, ‘सासूरवाशीण’सारख्या काही चित्रपटांच्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत, त्यांची असलेली भावनिक बांधिलकी हे सगळं मला त्या पुस्तकात आणि माहितीपटात दिसलं. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ठरवलं होतं की आपण इतरही शहरात या माहितीपटाचं प्रसारण करून अण्णासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची आजच्या पिढीला माहिती करून देऊ या, पण करोना आणि त्यानंतर आलेल्या टाळेबंदीच्या दिवसांत ते शक्य झालं नाही. अण्णासाहेब देऊळगावकर यांची कथा सांगण्याची पद्धत वेगळी होती, ती सांगताना तो सगळा चित्रपट ते डोळ्यासमोर उभा करत. महत्त्वाचं म्हणजे, अनेक प्रकारच्या अडीअडचणीतून जाऊनही त्यांनी आपलं वैशिष्टय़ आणि चित्रपट या माध्यम व व्यवसायाशी असलेली बांधिलकी कायम ठेवली. खरंच ती पिढीच वेगळी होती.

शब्दांकन – दिलीप ठाकूर