ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास निधन झाले. सोलापुरात वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८वर्षाचे होते. मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो. मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले असून पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोलापुरात त्यांच्या ‘मुदिता’ निवासस्थानी धाव घेऊन दिवंगत डॉ. पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
डॉ. पवार यांना गेल्या मंगळवारी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले होते. गो. मा. पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यलेखन केलं आहे. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते.
डॉ.पवार यांना साहित्य अकादमी पुरस्कार (नवी दिल्ली), भैरूरतन दमाणी पुरस्कार (सोलापूर), शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, (कुर्डुवाडी), रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (वाई), पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, (प्रवरा नगर), महाराष्ट्र फाऊंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, (मुंबई), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, (औरंगाबाद), शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार (सोलापूर), मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, (औरंगाबाद) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
डॉ. पवार यांचे साहित्यलेखन –
पुस्तके, विनोद – तत्व व स्वरूप, मराठी विनोद – विविध अविष्काररूपे, निवडक फिरक्या निवडक मराठी समीक्षा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – जीवन व कार्य, निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – भारतीय साहित्याचे निर्माते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २, द लाईफ अॅण्ड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ. पुस्तके लिहिली अथवा संपादित केली. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध सादर केले आहेत. त्याांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर २२ विद्यार्थ्यांनी एम.फीलची पदवी प्राप्त केली आहे.
दरम्यान, प्रा. पवार यांचा जन्म १३ मे १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथे झाला. शालेय शिक्षण नरखेड (ता. मोहोळ) येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण मध्ये झाले. मराठी विषयातून एम. ए. चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अध्यापनाच्या क्षेत्रात ३३ वषे सेवा केली. यात शासकीय महाविद्यालय अमरावती, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथेही अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून विपूल साहित्य निर्मिती केली. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, एक पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.