रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीत रंगभूमी आता कालबाह्य़ झाली आहे. त्यासाठी तळमळीचे, हरहुन्नरी नवे लेखक, दिग्दर्शक, कलाकार मिळणं मुश्कील झालं आहे. अधूनमधून ‘सं. अवघा रंग एकचि झाला’, ‘संगीत देवबाभळी’सारखी नाटकं रंगभूमीवर येतातही, पण ती अपवाद म्हणूनच. याचं कारण प्रेक्षकांची बदललेली चव, संगीत रंगभूमीवरच्या विषयांच्या मर्यादा, संगीत रंगभूमीचा ध्यास असलेली पिढी (लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, गायक, वादक वगैरे) अस्तंगत होणं यासारखी अनेक आहेत. यंदाचं वर्ष हे संगीत रंगभूमीला पुन्हा ऊर्जितावस्था आणणाऱ्या कै. विद्याधर गोखले यांचे तसंच पं. राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या पुढयाच्या पिढयांनी ‘सं. मंदारमाला’, तसंच नुकतंच रंगमंचावर आलेलं ‘डबल लाइफ’सारखी नाटकं रंगभूमीवर आणली आहेत. पैकी ‘डबल लाइफ’ हे नवंकोरं नाटक रंगशारदा प्रतिष्ठानतर्फे मंचित झालं आहे. नाटककार विद्याधर गोखले यांनी नेहमीच नव्याचा ध्यास घेतला. नव्या पिढीवर विश्वास टाकला. त्यांचंच अनुकरण करत त्यांचे पुत्र विजय गोखले यांनी ‘डबल लाइफ’ हे आगळ्या पठडीतलं म्युझिकल कॉमेडी नाटक रंगमंचावर सादर केलं आहे. त्याचा विषय भूत आणि वर्तमानाची सांगड घालणारा आहे. रवींद्र भगवते लिखित आणि रणजीत पाटील दिग्दर्शित हे नाटक आजच्या काळात कुणी शंभर वर्षांपूर्वीची संस्कृती कवटाळून बसल्यास काय घोटाळे, गडबड होईल याचा म्युझिकल कॉमेडीच्या अंगानं धमाल धांडोळा घेतं. शंकरशास्त्री पिंपळवेढेकर यांच्या कुटुंबात शंभर वर्षांपूर्वीची आपली पुरातन संस्कृती जतन करण्याचं काम गेल्या सहा पिढयांपासून होत आहे. पण त्यांचा मुलगा गजानन ऊर्फ गॅज हा मात्र घरात एक आणि बाहेर एक अशा वेगवेगळ्या रूपांत वावरतोय. घरात सदरा-पायजमा, शेंडी, जानवं; तर बाहेर टीशर्ट-जिन्सची पॅंट आणि तोंडी आंग्ल भाषा, खाणंपिणं असं त्याचं दुहेरी रूप आहे. त्याचे वडील शंकरशास्त्रीही प्राचीन हिंदू संस्कृतीचे गोडवे गाणारे असले तरी मनानं मात्र नव्या युगात वावरतात. अर्थात घरात बायकोच्या (पार्वतीबाई) धाकानं ते नाइलाजानं कडक सोवळंओवळं वगैरे पाळतात. त्यांच्या पूर्वजांनी घरात मध्ययुगीन संस्कृती पाळण्याचं कडक व्रत घेतलेलं. ते जतन केलं नाही तर घरातल्या स्त्रीला वैधव्य येणार अशी त्यांची समजूत. त्यामुळे ते न पाळण्याचं धारिष्टय कुणीच दाखवत नाही. गजानन हा आधुनिक चालचलन असलेल्या नताशा ऊर्फ नॅटीच्या प्रेमात पडलाय. पण आईच्या धाकामुळे तो नऊवारी नेसणाऱ्या, शुद्ध मराठी भाषा बोलणाऱ्या, महाराष्ट्रीय स्वैपाक करणाऱ्या मुलीशीच लग्न करू शकणार असतो. त्याकरता तो नॅटीला कसंबसं पटवतो. यासाठी आईला आपल्याला स्वप्नात एक दृष्टान्त झाल्याचं तो खोटंच सांगतो. आई ज्या देवळात जाते तिथे एक नऊवारी नेसलेली, शुद्ध मराठी बोलणारी मुलगी तिला दिसेल, तीच आपली होणारी वधू असेल असा स्वप्नात आपल्याला दृष्टान्त झाल्याचं तो आईला सांगतो. आणि त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी नताशाला पारंपरिक वेशात त्या देवळात जाण्यास सांगतो. त्याची आई पार्वतीबाई त्याप्रमाणे देवळात जाते. तर तिथे तिला गजाननने वर्णिल्याप्रमाणे एक मुलगी दिसते. हीच आपली भावी सून आहे अशी तिची खात्रीच पटते. ती त्या मुलीला (रिद्धी) तिने आपल्या वडलांना घेऊन येत्या रविवारी आपल्या घरी यावं आणि तिथं आपल्या मुलाबरोबर तिच्या लग्नाचं पक्कं ठरवू या असं सांगते. परंतु त्याचवेळी नताशाही (‘सिद्धी’ बनून) तशाच पारंपरिक वेशात देवळात येते आणि पार्वतीबाई गोंधळात पडतात. तीही पार्वतीबाईंना इम्प्रेस करण्यासाठी सर्व काही अगत्यपूर्वक करते. त्यांचा विश्वास संपादन करते. शेवटी या सगळ्या गोंधळाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी पार्वतीबाई तिलाही रविवारी आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देते.

हेही वाचा >>> यहाँ सब ग्यानी है..! सौरभ शुक्ला

एकाच दिवशी दोघीही जणी त्यांच्या घरी येतात. गजानन या प्रकारानं गोंधळात पडतो. त्याला नताशाशीच लग्न करायचं असतं. आता या दुसऱ्या मुलीला कशी कटवायची, या दुग्ध्यात तो पडतो. (खरं तर शंकरशास्त्र्यांनीच त्या मुलीला (रिद्धी) मुलाचं लग्न जमवण्याकरता अशा तऱ्हेनं देवळात यायला सांगितलेलं असतं.) तेव्हा पार्वतीबाई त्यांची स्पर्धा लावतात. त्या दोघींनीही जेवण, संगीत, भाषा यांची परीक्षा द्यायची आणि मग त्यांच्या त्या स्पर्धेतून त्या आपल्या भावी सुनेची निवड करणार असतात.

त्यानुसार त्या दोघींच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतात. या स्पर्धेत नेमकं काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित.

लेखक रवींद्र भगवते यांनी संगीत नाटकाची ही नवी, हलकीफुलकी आवृत्ती तयार करताना त्यात एक आधुनिक कथानक पेरलं आहे; जे प्रेक्षकांचं छानपैकी मनोरंजन करणारं आहे. त्याला त्यांनी जुन्या संगीत नाटकांतील पदांची झलक तसंच आधुनिक गाण्यांची फोडणी दिली आहे. त्यामुळे आजचे आणि जुनेही प्रेक्षकही सुखावतात. निरनिराळ्या संगीत घराण्यांतील तीव्रतर स्पर्धा, निरनिराळ्या संगीतप्रकारांतील ईष्र्या हे विषय अनेक नाटकांतून यापूर्वी उत्तमरीत्या हाताळले गेले आहेत. त्यामुळे त्या वाटेला न जाता नव्या-जुन्याचा संगम असणारं हे नाटक रवींद्र भगवते यांनी रचलं आहे. मध्ययुगीन संस्कृती आणि आजची संस्कृती यांचं फ्युजनही त्यामुळे त्यांना साधता आलं आहे. आणि त्यातून हा विषय हसतखेळत मांडण्याची पद्धतही आजच्या प्रेक्षकांच्या पचनी पडणारी आहे.

तरुण दिग्दर्शक रणजीत पाटील यांनी ही आगळी संगीतमय सुखात्मिका तितकीच रंगतदार रीतीनं मांडली आहे. आजची पिढी आणि पुराणमतवादी पिढी यांच्यातील संघर्ष त्यांनी छान दाखवला आहे. यातले अनेक प्रसंग विरोधाभासातून त्यांनी उत्तमरीत्या खुलवले आहेत. नव्या पिढीला जुन्या पिढीशी जुळवून घेताना काय काय आणि कोणकोणती यातायात करावी लागते, त्यातून कसकसे विनोदी प्रसंग निर्माण होतात, त्यातून उडालेल्या भंबेरीतून बाहेर येण्यासाठी नवी पिढी काय काय उचापती करते आणि त्याद्वारे निर्माण होणारे नवेच पेच.. हे सारं सारं म्हणजे ‘डबल लाइफ’ हे नाटक होय.

प्रदीप मुळ्ये यांनी शंकरशास्त्र्यांचं घर आणि बाहेरची स्थळं नेपथ्यातून नेमकी उभी केली आहेत. श्रीनाथ म्हात्रे यांचं संगीत जुन्या-नव्याचा  संगम साधणारं आहे. अमोघ फडके यांची प्रकाशयोजना यातलं नाटय खुलवणारी आहे. कृणाल पाटील यांची नृत्यं, राजन वर्दम यांची रंगभूषा, वरदा सहस्रबुद्धे यांची वेशभूषा नाटकाची मागणी पुरवणारी. यात लाइव्ह संगीतसाथ करणाऱ्या मंडळींचं योगदानही तितकंच महत्त्वपूर्ण आहे.

सगळ्या कलाकारांनी नाटकाची पिंडप्रकृती ओळखून आपापली कामं चोख केली आहेत. गजाननच्या भूमिकेत उदित पाटील चपखल बसले आहेत. त्यांची जुन्या-नव्याचा तोल सांभाळताना होणारी तारेवरची कसरत, नताशाला राजी करताना त्याला होणारा त्रास, घरातलं आणि बाहेरचं संपूर्णपणे वेगळं वागणं-बोलणं त्यांनी अचूक टिपलंय. नताशा ऊर्फ नॅटी झालेल्या शर्वरी बोरकर गाण्याच्या जाणकारीसह आधुनिकता आणि पारंपरिक ढंग यांचा साज सहज ल्यायल्या आहेत. त्यांचा वावरही उत्स्फूर्त वाटतो. ऋचा मोडक या रिद्धीच्या भूमिकेत अदबशीर वागता-बोलतात. चिडल्यानंतर त्यांच्या बोलण्यातील फरक त्यांनी उच्चारांतून नेटका पकडला आहे. दीप्ती भागवत यांची पार्वतीबाई जुन्या परंपरांचं पालन करताना त्यातल्या खाचाखोचा नीट व्यक्त करतात. त्यांचं संमोहनावस्थेतलं वेषांतर आणि आधुनिक होणंही त्या तितक्याच सहजतेनं साकारतात. शशिकांत दळवींचा पंगतवाढेकर आपल्या वाटयाचे हशे चोखपणे वसूल करतो. विजया महाजन यांची सासूबाई करारी. त्यांचं दरारापूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांनी छान वठवलंय. सूत्रधाराची भूमिका शुभम जोशी यांनी नीटस केली आहे. शंकरशास्त्री पिंपळवेढेकरांचं धांदरट अघळपघळपण विजय गोखले यांनी तितक्याच धांदरटपणानं साकारलं आहे. ‘डबल लाइफ’ ही नव्या ढंगाची म्युझिकल कॉमेडी मनोरंजनेच्छुक प्रेक्षकांची तहान भागवणारी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay gokhale presented double life musical comedy play review zws
Show comments