Netflix Series IC 814 Row: नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसीरीज ‘आयसी-८१४ : द कंदहार हायजॅक’ वादात अडकल्यानंतर आता नेटफ्लिक्सने यावर प्रतिक्रिया दिली आहे. १९९९ साली पाकिस्तानातील हरकत-उल-मुदाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. या कथेवर सदर सिनेमा बेतलेला असून या घटनेतील दोन अतिरेक्यांची नावे हिंदू असल्याचे दाखविल्यानंतर वाद उसळला होता. कथितरित्या वादग्रस्त भागाबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे ‘नेटफ्लिक्स’ला सांगण्यात आले होते. त्यानुसार आता नेटफ्लिक्सकडून उत्तर देण्यात आले आहे.

नेटफ्लिक्सने काय म्हटले?

सरकारला दिलेल्या उत्तरात नेटफ्लिक्सने म्हटले की, भविष्यात सादर होणाऱ्या कलाकृतींबाबत काळजी घेतली जाईल, तसेच राष्ट्राच्या भावनांचा आदर केला जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याबरोबर झालेल्या बैठकीत नेटफ्लिक्सच्या भारतातील कटेंट हेड मोनिका शेरगिल यांनी आगामी काळात कलाकृतींबाबत अधिक काळजी घेऊ असे आश्वासन दिले.

हे वाचा >> Netflix’s IC 814: द कंदहार हायजॅक, दहशतवाद्यांच्या नावांवरून पेटला वाद; नेमकं प्रकरण काय?

केंद्र सरकारने कोणता आक्षेप घेतला होता?

सदर बैठकीत सरकारने नेटफ्लिक्सच्या कटेंट हेडना या वेबसीरीजमधील अतिरेक्यांच्या नावाबाबत प्रश्न विचारले गेले. जेव्हा हिंदू नावाचा उल्लेख होतो, तेव्हा खाली सबटायटल किंवा कॅप्शनमध्ये अतिरेक्यांची खरी नावेही द्यायला हवी होती, असे सरकारकडून सांगण्यात आले. तसेच वेबसीरीजमध्ये अपहरणकर्ते अतिरेकी ठाण आणि संवेदनशील वाटत आहेत. तर त्यांच्याशी तडजोडीची चर्चा करणारे अधिकारी फारच दुबळे आणि संभ्रमित असलेले दिसत आहेत, असा आक्षेप सरकारने घेतला होता.

अपहरणकर्त्यांची समुदाय ओळख लपवण्यासाठी त्यांची ‘शंकर’ आणि ‘भोला’ अशी नावे ठेवण्यात आल्याचा आरोप काही प्रेक्षकांनी केला आहे. तसेच अतिरेक्यांची मानवीय बाजू दाखविल्यामुळे अनेकांनी ‘एक्स’सारख्या समाजमाध्यमांवर बॉयकॉट ‘नेटफ्लिक्स’, बॉयकॉट बॉलिवूड आणि आयसी८१४ असे अनेक हॅशटॅग चालवून सदर सीरीजचा विरोध केला होता.

‘‘कोणालाही या देशाच्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही”, असा आक्षेप घेत केंद्र सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली. नेटफ्लिक्सच्या कटेंट हेड यांना नोटीस देताना सरकारने सांगितले, “आम्ही कलाकृती निर्माण करणाऱ्या आणि ती प्रदर्शित करणाऱ्या सर्वांचा आदर राखतो. पण याचा अर्थ तथ्यांशी छेडछाड व्हावी, असा नाही. सर्जनशीलतेच्या नावावर राष्ट्राच्या भावनांशी कुणीही खेळू नये.”

अपहरण कसे घडले?

२४ डिसेंबर १९९९ रोजी, इब्राहिम अथर, सनी अहमद काझी, जहूर इब्राहिम, शाहिद अख्तर आणि सय्यद शाकीर या पाच दहशतवाद्यांनी काठमांडू ते दिल्लीच्या उड्डाणादरम्यान ‘IC-814’ या विमानाचे अपहरण केले होते. यात क्रूसह १८० प्रवासी होते, ज्यांना आठ दिवस ओलिस ठेवण्यात आले होते. भारताने कट्टर दहशतवादी मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांना सोडल्यानंतर ओलिसांना सोडण्यात आले. परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी विशेष विमानाने त्यांना कंदहारला नेले.

‘IC 814: द कंदहार हायजॅक’ या वेबसीरिजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, अरविंद स्वामी, दिया मिर्झा आणि पत्रलेखा यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या विमानाचे वैमानिक कॅप्टन देवी शरण आणि पत्रकार श्रींजय चौधरी यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइट इनटू फियर: द कॅप्टन्स स्टोरी’ या पुस्तकापासून ही वेबसीरिज प्रेरित आहे.