१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानिमित्ताने विशेष टाडा न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात एकाच वेळी  आनंद आणि दु:ख, काळजी, हुरहुर असे परस्परविरोधी भाव उमटले होते .

शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास न्यायाधीश गोविंद सानप यांनी मुस्तफा डोसा, अबू सालेम, ताहिर र्मचट, फिरोज खान, करिमुल्ला खान, रियाज सिद्धिकी आणि कय्यूम शेख या सात जणांचा प्राथमिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. त्याआधी तळोजा कारागृहातून येणारा सालेम न्यायालयात न पोहोचल्याने सुनावणी खोळंबली होती. सर्व सालेमचीच वाट पाहात होते.

डोसाचा निकाल सुरुवातीला जाहीर करण्यात आला. न्यायदालनात आल्यापासूनच चिंताग्रस्त असलेला डोसा अपल्याविरोधातला निकाल ऐकताना अस्वस्थ झाला होता. न्या. सानप काय सांगत आहेत हे नीट समजावून घेण्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला डोसा सारखा टाचेवर उभा राहत होता. निकाल विरोधात जाणार हे लक्षात येताच त्याने डोक्यावर हात मारून घेतला. सर्वच आरोपांमध्ये दोषी ठरल्याचे लक्षात येताच त्याचा चेहरा पडला. त्याची चिडचिड वाढली. सुनावणी संपल्यानंतर त्याने सर्वप्रथम वकिलाला गाठले आणि भविष्य समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगाल सरकारने शिक्षेबद्दल दिलासा देऊनही सालेमचीही अस्वस्थता वाढली होती. दाऊदचा बालपणीचा मित्र आाण विश्वासू साथीदार ताहिर र्मचट, मुस्तफा डोसाचा साथीदार फिरोज खान, सालेमचा मित्र आणि आरोपी रियाझ सिद्धिकी त्या तुलनेत संयमात होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. सुनावणीनंतर कुटुंबीयांना भेटण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने करिमुल्ला भलताच खूश दिसला.सर्वात खूश होता कय्यूम. सर्व आरोपांतून निर्दोष सोडल्याचे समजताच त्याने आरोपीच्या पिंजऱ्यातूनच हात जोडून न्यायालयाचे आभार मानले. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपतच नव्हता. का नाही होणार आनंद, दहा वष्रे मी कारागृहात काढली आहेत. दहा वर्षांनंतर मोकळा फिरेन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोषी ठरवला गेलो असतो तर देशद्रोही किंवा गुन्हेगार असल्याचा डाग चारित्र्यावर लागला असता. त्यातून सुटल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण, अशी प्रतिक्रिया कय्यूमने ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. न्यायालयाने जाहीर केलेला निकाल दालनाबाहेर गर्दी केलेल्या नातेवाईकांनाही समजला. दोषी ठरलेल्यांचे नातेवाईकही धीरगंभीर बनले.

हा संपूर्ण देशवासीयांचा विजय आहे. मुंबई पोलीस, सीबीआयने केलेल्या मेहनतीचे चीज आहे. या निकालामुळे समाजात सक्त संदेश जाईल, जेणेकरून पुन्हा असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. त्यासोबतच आपल्या शेजारी राष्ट्रालाही या निकालातून इशारा मिळू शकेल.  अ‍ॅड. दीपक साळवी, विशेष सरकारी वकील, सीबीआय

या निकालाचे मी स्वागत करतो. बॉम्बस्फोटांनंतरचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. अवघ्या काही तासांत बॉम्बस्फोटांच्या सूत्रधारांसह आरोपींची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. आज ज्यांना न्यायालयाने दोषी धरले त्यांचीही नावे याच तपासातून समोर आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी केलेला तपास अचूक होता ही बाबही स्पष्ट झाली.  राकेश मारिया, बॉम्बस्फोट मालिकेचे तत्कालीन तपास अधिकारी 

 

आरोपींचा सहभाग

ताहिर र्मचट ऊर्फ ताहिर टकल्या दुबईतून प्रत्यार्पण केल्यानंतर २०१०मध्ये अटक

  • दाऊद इब्राहिमचा बालपणीचा मित्र. बॉम्बस्फोट मालिकेआधी ताहिर दुबईत दाऊदसोबतच होता. बाबरी मशीद पतनानंतर मुस्लीम देशांमध्ये संतापाची लाट उसळली आणि अनेक ठिकाणी तेहरिक-ए-जंग म्हणजेच बदल्यासाठी धडपड सुरू झाली. त्यात ताहिरही सहभागी होता. त्याने खूप आधीपासून बदल्यासाठी तरुणांची जमवाजमव सुरू केली होती. दुबईत बॉम्बस्फोट मालिकेसाठी घडलेल्या पहिल्या बैठकीत ताहिर सहभागी होता. या बैठकीत आयएसआयकडून स्फोटके, शस्त्रसाठा मिळवण्याची, तरुणांना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी धाडण्याची, त्यासाठीच्या सर्व खर्चाची जबाबदारी ताहिरने उचलली.

 मुस्तफा डोसा २० मार्च २०० रोजी दिल्ली येथे अटक

  • बाबरी मशीद पतानानंतर उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये मुस्लीम समाजावरील तथाकथित अत्याचाराचा बदला घेण्यासाठी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांची दुबईत आपल्या घरी पहिली बैठक घेणाऱ्या महोम्मद अहमद डोसाचा धाकटा भाऊ मुस्तफा अहमद डोसा .  या बैठकीत बॉम्बस्फोट मालिकेसाठी आवश्यक असलेला स्फोटक(आरडीएक्स), शस्त्रसाठा, दारूगोळ्याचा साठा मुंबईत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी मुस्तफाने अंगावर घेतली.

अबू सालेमपोर्तुगालहून प्रत्यार्पण केल्यानंतर ११ नोव्हेंबर २००५ रोजी अटक

  • दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमचा विश्वासू साथीदार अबू सालेम. डोसाने भरुच येथे धाडलेला शस्त्रसाठा सालेमने मुंबईत आणला. अनीसच्या इशाऱ्यावरून सालेमने अभिनेता व या खटल्यातील आरोपी संजय दत्तच्या घरी तीन एके ५६ पोहोचवल्या. सोबत काही ग्रेनेड्स आणि काडतुसेही पोहोचवली. यापैकी काही शस्त्रसाठा सालेमने दत्तकडून परत घेतला. दत्तसोबत मुंबईतल्या अनेक साथीदारांकडे त्याने शस्त्रसाठा पोहोचवला. बॉम्बस्फोटांनंतर तो दडवण्याचा प्रयत्न केला.

फिरोज अब्दुल रशिद खान ५ फेब्रुवारी २०१० रोजी कोपरखरणे येथून अटक

  • मुस्तफा डोसाचा अत्यंत विश्वासू साथीदार. डोसा बंधूंच्या तस्करीत सक्रिय असलेल्या फिरोजने मुस्तफाने पाकिस्तानहून धाडलेली शस्त्रसाठय़ाची पहिली खेप दिघी किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरवून घेतली. त्याआधी हे खेप विनाअडथळा दिघीपर्यंत यावी यासाठी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत फिरोजची उपस्थिती होती. या खेपेत चांदीसोबत घातक शस्त्रे, स्फोटके येणार आहेत याची पूर्ण कल्पना फिरोजला होती. या स्फोटकांच्या माध्यमातून मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडविण्याचा कट आहे, हेही त्याला माहीत होते. बॉम्बस्फोट मालिका घडेपर्यंत शस्त्रसाठा दडवून ठेवणे. स्फोटांनंतर शस्त्रसाठा आणि स्फोटके नष्ट करणे यात फिरोजची प्रमुख भूमिका होती.
  • करीमुल्ला खान – करीमुल्ला हा खटल्यातील आरोपी इजाज पठाण टोळीसाठी काम करत होता. इजाज पठाणचा खास हस्तक म्हणून तो प्रसिद्ध होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच तो कटाच्या प्रत्येक बैठकीत सहभागी झाला होता. त्याने शेखाडी आणि दिघी येथे शस्त्र व स्फोटकांचा साठा उतरवण्यासाठी माणसांची जुळवाजुळव केली होती. कटाच्या एका बैठकीत टायगर मेमनने त्याला सांगितले होते की, हे स्फोट बाबरी मशिदीच्या अध:पतनाचा सूड आहे. सीबीआयने त्याच्याविरोधात जो पुरावा सादर केला होता. तो सगळा ग्राह्य मानत न्यायालयाने त्यालाही सगळ्या आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे.
  • रियाझ सिद्दिकी -न्यायालयाने सिद्दिकीला केवळ ‘टाडा’च्या आरोपामध्ये दोषी ठरवले आहे. गुजरातमधील भरुच येथून शस्त्रसाठा सालेमने मुंबईत आणला त्या वेळी सिद्दिकी सालेमसोबत होता. मात्र त्याचा बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये सहभाग होता हे सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याची अन्य आरोपांतून सुटका केली आहे.