वाढत्या उकाडय़ामुळे पश्चिम रेल्वेवर चालविल्या जाणाऱ्या एकलत्या एक वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एप्रिल २०१९ मध्ये तब्बल ४ लाख ४७ हजार ५४० प्रवाशांनी या गाडीने प्रवास केला. त्याआधीच्या वर्षांत प्रत्येक महिन्यात सरासरी हाच आकडा ३ लाख ९२ हजार एवढा होता. या प्रवाशांना रेल्वेनेही भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. वातानुकूलित लोकलच्या भाडेदराची २४ एप्रिल २०१९मध्ये फेररचना होणार होती. परंतु, ३१ मे २०१९पर्यंत त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. महिनाभर या गाडीचे दर ‘जैसे थे’च राहणार आहेत. २५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावली. या गाडीच्या दिवसाला बारा फेऱ्या होतात. मात्र यामुळे सामान्य गाडय़ांच्या बारा फेऱ्यांवर गदा आल्याने वातानुकूलित गाडीविरोधात बरीच आरडाओरड झाली. त्यातच चर्चगेट ते विरापर्यंत २०५ रुपये तिकीट व महिन्याच्या २,०४० रुपये पासामुळे प्रवाशांना चांगलाच घामही फुटला. त्यामुळे अवाच्या सव्वा भाडे, गाडीची गैरसोयीची वेळ इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळू लागला. बारा फेऱ्यांपैकी सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेतील तीन ते चारच फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो. परंतु उन्हाळ्यात या गाडीचा प्रतिसाद वाढतो. एप्रिल २०१९ मध्ये एकूण ४ लाख ४७ हजार ५४० प्रवाशांनी प्रवास केला आहे. दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३२ हजार १३६ आणि महिन्याच्या पासावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ लाख १५ हजार ४०४ एवढी आहे. एप्रिल महिन्यात प्रवासी संख्येत वाढ झाल्याने पश्चिम रेल्वेला तेवढेच चांगले उत्पन्न मिळाले आहे. १ कोटी ८३ लाख ६४ हजार रुपयांची कमाई रेल्वेने केली आहे. २०१८-१९ शी तुलना करता या वर्षांतील प्रत्येक महिन्यात प्रवासी संख्या सरासरी ३ लाख ९२ हजार एवढी होती. ५८ लाख प्रवासी, २३ कोटी रुपये महसूल पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये सुरू झाली. आतापर्यंत या लोकलमधून ५८ लाख ८४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर २३ कोटी ९२ लाख ४३ हजार रुपयांचा महसूलही रेल्वेला मिळाला आहे.