राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ईडीनं त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होत. मात्र, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. करोनामुळे त्यांनी ऑडिओ / व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे.

मंगळवारी ईडीला लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी लिहिले की, “मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. २५ जूनला तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही व मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.”

ईडीने त्याच्यांसंदर्भात दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाची (ईसीआयआर) प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचे देशमुख म्हणाले. ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक स्वरुपातील उपस्थिती राहावे लागेल असे  स्पष्ट केलेल नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

भाजपकडून चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी

देशमुख हे मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहाण्याची शक्यता होती. गेल्या आठवडय़ात ईडीने त्यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र देशमुख यांनी वकिलाला पाठवून मुदत मागून घेतली. ईडीने दुसरे समन्स बजावत देशमुख यांना मंगळवारी चौकशीस बोलावले आहे.

बार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी संस्थेच्या नावे – ईडी

मुंबईतील बार मालकांकडून लाच म्हणून उकळलेल्या रक्कमेतील चार कोटी १७ रुपये देशमुख यांनी नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेत वळविल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. ही रक्कम देणगी स्वरुपात प्राप्त झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी दिल्लीतील दोन व्यक्तींना देशमुख यांचे चिरंजीव ऋषीकेश यांनी नागपूरहून रोख रक्कम पाठवली. या दोन व्यक्तींनी ही रक्कम देशमुख अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेच्या खात्यांवर जमा केली, असेही ईडीने न्यायालयात सांगितले. या संशयास्पद आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत ईडीने देशमुख यांच्या दोन सहायकांना गेल्या आठवडय़ात अटक केली होती.

काही दिवसांनी अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार – किरीट सोमय्या

परमबीर सिंह यांच्या पत्राने उडाली होती खळबळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. “मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता. या पत्रानंतर झालेल्या उडालेल्या गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीबीआय आणि नंतर ईडीनं त्यांच्या घरांवर छापे टाकल्यामुळे टाकले होते.