शिवजंयती साजरी करण्यासंबंधी ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकारने नियमावलीमध्ये दहापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये अशी सूचना केली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करुन १०० जणांसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजपा नेत्यांनी शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकावरील टीका सुरु ठेवली आहे. अजब वाटले तरी नियम पाळा असं आवाहन करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं अशी उपहासात्मक टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “त्यांनी भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!”.

आणखी वाचा- ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’; शिवसेनेच्या बॅनरवर मनसेने लावली पत्रकं

१९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजंयती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन करत राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी गुरुवारी नियमावली जारी केली होती. त्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. यावरुन भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे टाकलं असून शुक्रवारी नव्याने नियमावली जाहीर केली आहे. आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता १०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. बघुया काय आहे नवीन नियमावली:
काय आहे नवीन नियमावली :-

1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

3. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

5. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

6. Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.