पॉवर ग्रीडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत सोमवारी अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. मुंबईत परिस्थिती आता हळुहळु पूर्वपदावर येत असली तरीही विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून आतापर्यंत जे कधी नाही झालं ते सगळं होत आहे. आता फक्त डायनासोर आणि एलियन दिसायचे बाकी आहेत…ते ही दिसतील असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टिकेची झोड उठवली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुंबईतील वीज पुरवठा खंडीत प्रकरणावर टीका केली आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आलं असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.

अवश्य वाचा – मुंबईत वीज पुरवठा खंडीत ! अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला