महाराष्ट्र दिनी हुतात्मा स्मारकाची परिस्थिती पाहून नालायक भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले अशा संतापजनक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, दरवर्षी महाराष्ट्र दिनाला हुतात्मा चौकाला सजावट केली जायची. महाराष्ट्र शासन याची संपूर्ण जबाबदारी घेऊन हे स्मारक सजवायचे. मात्र, यंदा या स्मारकावर एक साधं फूलही दिसत नाहीए. ही महाराष्ट्र सराकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आज जे चित्र दिसतंय ते घाणेरडं आहे. भाजप आणि शिवसेना दोघेही सत्तेत असताना या स्मारकाचा योग्य तो मान राखला गेला नाही. मला दुर्दैवाने म्हणायला लागतयं की नालायक भाजपवाल्यांपेक्षा काँग्रेसवाले परवडले. त्यांच्या काळात निदान या स्मारकाची सजावट तरी केली जायचे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आज हुतात्मा स्मारकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप-सेनेचे काही नेते वगळता अन्य कुणीही फिरकले नाही.

आशिष शेलार काय म्हणाले-
राज ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, राज यांचा राजकीय अभ्यास कच्चा आहे. हुतात्मा चौक राजकारणाचा अड्डा होता कामा नये ही भाजपची भूमिका आहे. मनसे पक्ष त्यांचे राजकीय स्थान गमावून बसले आहे. स्वतःची राजकीय जागा बनवण्यासाठी त्यांनी हुतात्मा चौकाला निशाणा करू नये.