प्रकाशकाचे नाव न छापता वर्तमानपत्रात कविता छापली ती छापलीच पण नंतर अशोक शहाणे यांच्यासारख्या ज्येष्ठ समीक्षकाने प्रकाशक या नात्याने आपल्या हक्कासाठी अनेकदा खेटे घालूनही या वर्तमानपत्राकडून त्यांना ज्या पद्धतीने उडवून लावले गेले त्या गुर्मीला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने एकप्रकारे चपराक बसल्याचीच भावना व्यक्त होत आहे.
या निकालात अशोक शहाणे यांची बाजू मांडणारे वकील संजय खेर म्हणाले की, अरुण कोलटकर हे मराठीतील खूप मोठे कवी आहेत. आणि त्यांच्या कवितांचा अशा प्रकारे वापर हा कविता चोरण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे स्वामित्वहक्क कायद्याचा भंग असल्याचा दावा आम्ही केला. न्यायालयाने तो मान्यही केला. विशेष म्हणजे ज्या दिवशी न्यायालयात ही केस सुनावणीसाठी आली त्याच दिवशी केवळ दहा मिनिटांमध्ये न्यायाधीशांनी हा निकाल दिला. त्यादृष्टीनेही ही केस खूप महत्त्वाची ठरली.
‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांच्याशी संपर्क साधला असता आपल्यापर्यंत या निकालाची प्रत आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कवी संदीप खरे म्हणाले की, इंग्रजीप्रमाणे मराठी पुस्तकांच्या लाखोंच्या प्रती खपत नाहीत.  त्यामुळे मराठीतले उत्तमोत्तम लेखक, कवी लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावेत, हाच या सदरामागचा माझा मुख्य उद्देश होता. त्या दृष्टीकोनातूनच या सदरात मी कोलटकरांची ‘परंपरा’ ही कविता उद्धृत करून परंपरेचं सार मांडलं होतं. आपल्याकडे  साहित्य पोसण्याची वानवा आहे. त्यामुळे चांगलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं. कोलटकरांची कविता उद्धृत करण्यामागेही  हाच प्रामाणिक प्रयत्न होता.