करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. मात्र, दिवसेंदिवस मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे. अशातच भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास बंदी घातली आहे. पण रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पद स्वीकारताच लोकलबद्दल महत्त्वाची घोषणी केली आहे. “लोकल सुरु करण्यासंदर्भातील जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात आली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला वाटेल आता करोनाची स्थिती आटोक्यात आली आहे आणि रेल्वे सुरु करणं गरजेचे आहे. राज्याने त्या ठिकाणचा अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर रेल्वे सुरु केली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही,” असे दानवे म्हणाले. रेल्वे राज्यमंत्रपदाचा पदभार स्वीकारताच रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन झी २४ ताससोबत बोलताना दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत लोकलमधून सर्वांना प्रवास करण्याची परवानगी देण्यासंदर्भात माहिती दिली होती. “करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवणं, विकेंड लॉकडाऊन व मुंबईसारख्या शहरात लोकल बंद ठेवणं, असे पर्याय आपण स्वीकारले आहेत. पण आता मुंबईत लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे; असं असलं तरी लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तरच लोकल सुरू करता येईल,’ असं टोपे यांनी म्हटले होते.