“बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून वारंवार आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जातं आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी पत्रक जाहीर करुन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही भाजपा नेते मात्र त्यांच्यावर आरोप करणं सोडत नाहीत असंच दिसून येतं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- ‘उद्धव ठाकरेंनी करोनाशी लढावे कंगनाशी नाही’; फडणवीसांचा खोचक सल्ला

काय म्हणाले आशिष शेलार?
“वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून तिथे प्रामाणिक मतदार राहतात. बॉलिवूडचे अनेक लोक तिथे राहतात मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- “ठाकरे सरकारसाठी करोना हाच मुद्दा, बदनामीसाठी काहींनी कंगनाचा मुद्दा पुढे आणला”

काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील कांदिवली या ठिकाणी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने व्हॉट्स अॅपवर उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र फॉरवर्ड केले होते. या कारणामुळे ही मारहाण करण्यात आली. या मुद्द्यावरही आशिष शेलार यांनी टीका केली. गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.