मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय प्रतिस्पर्धी संपविण्याच्या उद्देशानेच एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. कर्नाटकातील येडियुरप्पाच्या धर्तीवर खडसे यांना लवकरच अभय दिले जाऊ शकते, पण चौकशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आडकाठी घालण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराजसिंग चौहान किंवा रमणसिंग या नेत्यांच्या विरोधात आरोप झाले. पण भाजप नेतृत्लाने त्यांना पाठीशी घातले. खडसे यांना मात्र घरी पाठविण्यात आले. यामागे बहुधा मुख्यमंत्री फडणवीस यांचे कारस्थान असू शकते, अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली. खसडे आणि भाजपमध्ये ‘डील’ झाले असून, खडसे यांना पुढील पाच-सहा महिन्यांमध्ये पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर खडसे यांच्याप्रमाणेच आरोप झालेल्या सर्व मंत्र्यांच्या चौकशीची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.