करोनाची दुसरी लाट ओसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असं असलं तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. करोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.

मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहे. त्याकडे राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात लोकलमधून प्रवास करण्यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याचा सल्ला राज यांनी दिला आहे. “मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी”, असं राज यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे काय म्हणाले?

मा. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहे, ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?

ही साथ एकाएकी जाणार नाही, असं जगातल्या तज्ञाचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही.

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.

त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करत आहे की, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी तरी अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल.

मला अपेक्षा आहे की, महाराष्ट्र सरकार या सगळ्याचा विचार करून त्वरित पावलं उचलेल…

-राज ठाकरे
अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना</p>