मुंबई ही मराठी माणसाच्या बापचीच आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी त्यांचा बाप दाखवावा असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर वाटत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर कंगना रणौतवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कंगनाने यावर ट्विट करत आपल्याला मुंबईत येण्यावरुन धमक्या मिळत असून ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र”

आणखी वाचा- “मी अ‍ॅक्शनवाला माणूस आहे,” कंगनाच्या धमकीच्या आरोपांवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

आणखी वाचा- ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा – कंगना रणौत

कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा’ असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे”. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.