मुंबई : राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या राज्यामध्ये १० वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यात नुकत्याच केलेल्या तपासणीमध्ये १० पैकी चार महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची मान्यता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना

राज्यात सध्या प्रस्तावित असलेल्या १० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुंबईतील जीटी व कामा रुग्णालयाचे एकत्रित महाविद्यालय, अंबरनाथ, भंडारा, बुलढाणा, वाशीम, अमरावती, जालना, हिंगोली, नाशिक आणि गडचिरोलीमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या १०० जागा उपलब्ध होणार आहेत. मात्र मागील आठवड्यामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रत्यक्ष पाहणीमध्ये प्राध्यापक, पायाभूत सुविधा आणि उपकरणांची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन संवाद साधण्यात आला होता. यात काही महाविद्यालयांना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. तर तीन ते चार वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामध्ये जीटी रुग्णालयातील प्रस्तावित महाविद्यालयाचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या तपासणीचा अहवाल येत्या काही दिवसात आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता असल्याचे एका राज्य सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण; बार व्यवस्थापकाला अटक

प्रस्तावित महाविद्यालयांपैकी अनेक महाविद्यालयांच्या इमारतींचे काम अपूर्ण आहे. प्राध्यापक, वसतिगृहे, पुस्तके, फर्निचर आणि उपकरणे आणि ग्रंथालये उपलब्ध नसणे, शिक्षक नियुक्त नसणे, बायोमेट्रिक्स बसवले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या प्रक्रियेत एका तपासणीनंतर क्वचितच मंजुरी मिळते. पहिल्या अर्जामध्ये कमतरता लक्षात आल्या की त्यात सुधारणा करून पुन्हा अर्ज करता येतो. असेही या अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात २०१४ ते २०२३ या कालावधीत नऊ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असताना, अनेकांना प्राध्यापक आणि वसतिगृहांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या महाविद्यालयांमधील सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.