मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली ५ टक्के पाणीकपात आता दुप्पट करण्यात आली असून बुधवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला असून मुंबईकर आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेने ५ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच आता पालिकेने १० टक्के पाणी कपाती लागू केल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ४७ कोटींच्या अपहाराप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल; आर्थिक गुन्हे शाखा करतेय तपास

मुंबईकरांना ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये मिळून केवळ ९८ हजार १८२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपल्बध आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणीसाठा ० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे, या धरणातून आता पाणीपुरवठा केला जात नाही. मोडकसागर धरणात १५.६५ टक्के, तानसामध्ये २५.२० टक्के, मध्य वैतरणामध्ये ९.२० टक्के, विहारमध्ये १९.४ टक्के, तुळशीमध्ये २७.२४ टक्के आणि भातसामध्ये केवळ २.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, या सातही धरणांचा एकूण पाणीसाठा ६.७८ टक्क्यांवर आला आहे. गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. धरणामध्ये उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. पालिकेने मुंबईत बुधवारपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, या पाणीकपातीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. झोपडपट्टी परिसरात एका नळाद्वारे चार ते पाच घरांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, पाणीकपातीमुळे अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, पाण्यावरून नागरिकांमध्ये वाद होवू लागले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईत लवकरच पावसाचे आगमन होईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल – सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाची जोडणी अंतिम टप्प्यात, महानगरपालिका आयुक्तांनी केली पाहणी

उपलब्ध पाणीसाठ्यावर पालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांतील पाणीसाठ्यात सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू ठेवण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

धरणातील पाणीसाठा

वर्ष –       उपलब्ध पाणीसाठा

२०२४ – ९८ हजार १८२ दशलक्ष लिटर

२०२३ – १ लाख ६७ हजार ५४९ दशलक्ष लिटर २०२२ – २ लाख २९ हजार ८१ दशलक्ष लिटर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 percent water cut in mumbai due to 6 percent water storage in dams mumbai print news zws
Show comments